वृत्तसंस्था/ मुंबई
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका 9 जूनपासून सुरू होणार असून या मालिकेसाठी 18 जणांच्या भारतीय संघाची घोषणा यापूर्वी करण्यात आली असून केएल राहुलकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या संघामध्ये ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा यांचाही समावेश आहे. मात्र, भारतीय क्रिकेट मंडळाच्या नियमामुळे या चारही क्रिकेटपटूंना आयपीएल पूर्ण झाल्यानंतर तंदुरुस्ती चाचणी पार करणे भाग असणार आहे.
या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट मंडळाने 5 जून रोजी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी मध्ये तंदुरूस्ती शिबीर आयोजित केले असून निवड करण्यात आलेल्या सर्व क्रिकेटपटूंना या शिबिरात दाखल होण्याचा आदेश बीसीसीआयने दिला आहे. उभय संघांतील पहिला टी-20 सामना नवी दिल्लीत 9 जूनला होणार आहे. दरम्यान आयपीएल क्रिकेट स्पर्धेची सांगता 29 मे रोजी होणार आहे.
गेल्या दोन महिन्यापासून भारतीय क्रिकेटपटू आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळत आहेत. या स्पर्धेत खेळताना आगामी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातील अनेक खेळाडूंसमोर दुखापतीची समस्या निर्माण झाली आहे. निवडण्यात आलेल्या सर्व क्रिकेटपटूंना बेंगळूरच्या राष्ट्रीय अकादमीमध्ये तंदुरूस्ती शिबिरात दाखल होण्याचा आदेश बीसीसीआयने बजावला आहे. या तंदुरूस्ती शिबिरात एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण तसेच फिजीओ नितिन पटेल यांच्याकडे सर्व जबाबदारी सोपविण्यात आली असून निवड केलेल्या खेळाडूंच्या तंदुरूस्तीबाबत निर्णय या शिबिरानंतर घेतला जाईल.
भारतीय टी-20 संघ- केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार), दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, वेंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवि बिस्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.