सर्व्हरवर अतिरिक्त ताण पडत असल्याने अन्न-नागरी पुरवठा खात्याचा निर्णय, लाभार्थ्यांसमोर अडचणी
बेळगाव : गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड अपडेटचा ताण प्रचंड वाढला आहे. दरम्यान सर्व्हरडाऊनची समस्या गंभीर बनू लागली आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदाच रेशनकार्ड अपडेटचे काम सुरू ठेवण्यात येत आहे. संबंधित लाभार्थ्यांनी याची नोंद घेऊन त्यावेळेत रेशनकार्ड अपडेट करून घ्यावे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा खात्याने केले आहे. सरकारने शक्ती, गृहज्योती, अन्नभाग्य पाठोपाठ गृहलक्ष्मीच्या अंमलबजावणीसाठी पूर्ण तयारी केली आहे. दरम्यान या गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड अनिवार्य आहे. मात्र बहुतांशी लाभार्थ्यांच्या रेशनकार्डमध्ये त्रुटी असल्याने अडचणी येऊ लागल्या आहेत. दरम्यान रेशनकार्ड अपडेटअंतर्गत नावात बदल, पत्त्यात बदल आणि दुरुस्तीची कामे केली जात आहेत. मागील पंधरा दिवसांपासून अन्न व नागरी पुरवठा कार्यालयात अपडेटसाठी रांगा लागल्या होत्या. दरम्यान अपडेटमुळे सर्व्हरवर लोड येऊ लागला आहे. त्यामुळे खात्याने आठवड्यातून एकदाच अपडेटची प्रक्रिया सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एक दिवस रेशनकार्ड अपडेटच्या कामासाठी नेमून दिला जाणार आहे. सर्व्हरवर होणारा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगाव विभागाला एक दिवस, बेंगळूर विभागाला एक दिवस अशा प्रकारे अपडेटचे काम चालणार आहे.
आज बेळगावमध्ये रेशनकार्ड अपडेटचे काम
बुधवार दि. 23 रोजी सकाळी 10 ते 4 यावेळेत बेळगाव येथील अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयात रेशनकार्ड अपडेटचे काम सुरू ठेवले जाणार आहे. संबंधित लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
जुन्या रेशनकार्डची अर्जनोंदणी लांबणीवर
जुन्या रेशनकार्डधारकांची गृहलक्ष्मीची अर्जनोंदणी लांबणीवर पडली आहे. जुनी रेशनकार्डे सद्यस्थितीत अपडेट केली जात आहेत. रेशनकार्ड अपडेट झाल्यानंतर ई-केवायसी आणि इतर कामासाठी 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे जुन्या रेशनकार्ड लाभार्थ्यांना गृहलक्ष्मीसाठी अर्ज करावयाचा असल्यास साधारण एक महिना थांबावे लागणार आहे.