रत्नागिरी : प्रतिनिधी
पावसाळ्यातील जून आणि जुलै या दोन महिन्यांच्या सागरी मासेमारी बंदीनंतर १ ऑगस्टपासून यांत्रिक मासेमारी नौकांना समुद्रात मासेमारी खुली झाली आहे. पण खराब वातावरणामुळे हंगामाचा शुभारंभ होणार की ब्रेक, लागणार याकडे मच्छीमार बांधवांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील सुमारे ४ हजार यांत्रिक मच्छीमार नौका समुद्रावर स्वार होण्याच्या तयारीत आहेत.
रत्नागिरी जिल्हयात १६७ किमी लांबीचा सागर किनारा लाभला आहे. त्यावर उपजिविका असणाऱ्या कुटुंबाची संख्या देखील मोठी आहे. जिल्हयात सर्वात अधिक लांबीचा सागर किनारा रत्नागिरी तालुक्यात आहे (५६ किलोमीटर). त्याखालोखाल गुहागर ३८ किमी, दापोली ३५ किमी, मंडणगड २० किमी आणि राजापूर १८ किमी सागर किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अध्यादेश २०२१ अन्वये १ जून २०२२ ते ३१ जुलै २०२२ (दोन्ही दिवस धरुन ६१ दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय सागरी क्षेत्रात यांत्रिक नौकांनी मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली होती.
ही पावसाळी मासेमारी बंदी यांत्रिक मासेमारी नौकांना लागू करण्यात आलेली होती. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपरिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू नव्हती. ही शासनस्तरावरून घालण्यात आलेली मासेमारी बंदी उठल्यानंतर १ ऑगस्टपासून मासेमारी हंगामाला प्रारंभ होत आहे. पण समुद्रातील शांत वातावरणाची मच्छीमारांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. समुद्रातील वातावरण अजूनही खालावलेले आहे.