वाद संपविल्याचा काँग्रेसचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस पक्षात नाराज असलेले मातब्बर नेते सचिन पायलट यांच्या उपस्थितीत पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी राजस्थानात पक्ष एकजूट होऊन निवडणूक लढविणार आणि विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. दोन्ही नेते काँग्रेस नेतृत्वाच्या प्रस्तावावर सहमत असल्याचे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे, परंतु तडजोडीचा फॉर्म्युला कोणता याबद्दल माहिती देणे टाळले आहे. तसेच या घोषणेमुळे पायलट अन् गेहलोत यांचे मौन पाहता राजकीय संघर्ष तूर्तास शमला असला तरीही तो कधीही उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेहलोत आणि पायलट यांच्यात सुमारे 4 वर्षे राजकीय संघर्ष सुरूच राहिल्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी सोमवारी 4 तासांपर्यंत मंथन केले. खर्गे आणि राहुल गांधी यांनी गेहलोत तसेच पायलट यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. पायलट आणि गेहलोत या दोघांनीही स्वत:ची भूमिका मांडली आहे. यावेळी काँग्रेस नेतृत्वाने दोन्ही नेत्यांना मतभेद बाजूला ठेवत वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही नेत्यांमधील तडजोडीचा फॉर्म्युला स्पष्ट नसला तरीही पायलट यांना त्यांच्या मागण्यांकरता आश्वासन देण्यात आल्याचे समजते.
गेहलोतांच्या नेतृत्वातच निवडणूक लढणार
आगामी काळात काँग्रेस अध्यक्ष खर्गे हे राजस्थानसंबंधी निर्णय घेणार आहेत. गेहलोत यांच्याच नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस लढविणार आहे, परंतु पायलट यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण असणार आहे. तडजोडीच्या पार्श्वभूमीवर पायलट आता गेहलोत सरकारच्या विरोधात आघाडी उघडणार नीत. तसेच गेहलोत देखील पायलट यांचा सन्मान राखतील.
2018 पासून नाराजी
2018 मध्ये सचिन पायलट हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असतानाच पक्ष राज्यात सत्तेवर आला होता. परंतु पक्षनेतृत्वाने पायलट यांना मुख्यमंत्रिपद देण्याऐवजी अशोक गेहलोत यांना सत्तेचे पद दिले होते. तर पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले होते. 2020 मध्ये उपमुख्यमंत्री पायलट यांनी 18 आमदारांच्या साथीने सत्तापालट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तेव्हा गेहलोतांनी स्वत:चे सरकार वाचविण्यासोबत सचिन पायलट यांना पक्षात एकाकी पाडण्यास यश मिळविले होते.
मागील वर्षीही संधी हुकली
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये गेहलोत यांना काँग्रेस अध्यक्ष केले जाणार होते, परंतु गेहलोत गटाने आमदारांची बैठकच होऊ दिली नव्हती. यामुळे पायलट यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदापासून वंचित रहावे लागले होते. यानंतर गेहलोत यांनी पायलट यांना ‘गद्दार’ संबोधिले हेते. या पार्श्वभूमीवर संयम गमावलेल्या पायटलांनी काही महिन्यांपूर्वी गेहलोत सरकारविरोधात मोर्चा उघडत पेपर लीक तसेच माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर कारवाई न केल्याप्रकरणी पदयात्रा काढली होती. तसेच राज्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे सतर्क झालेल्या पक्षश्रेष्ठींनी दोन्ही नेत्यांना दिल्लीत बोलावत राजकीय संघर्ष शमविण्याचा प्रयत्न केला आहे.