स्थानिक पातळीवरील नेत्यांना प्राधान्य देऊन निवडणुका लढवा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पुढच्या वर्षी लोकसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या आधी अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या सर्वच पक्षांकडून चुरशीने लढविल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. तसेच उपायही सुचविले आहेत.
भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये केवळ पंतप्रधान मोदींवर अवलंबून राहण्याची सवय सोडली पाहिजे. स्थानिक पातळीवरील नेत्यांना प्राधान्य देऊन स्थानिक मुद्द्यांवर या निवडणुका लढविल्या पाहिजेत. केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही विसंबून राहून चालणार नाही. लोकांच्यासाठी महत्वाचे असणारे इतर मुद्देही योग्य प्रकारे मांडण्याची तयारी दर्शविली पाहिजे, अशा या सूचना आहेत.
संघाचे मुखपत्र असणाऱ्या ‘ऑर्गनायझर’ या नियतकालिकाच्या संपादकीयात या सूचना करण्यात आल्या आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव का झाला, याचे विश्लेषण यात करण्यात आले आहे. कर्नाटकात भ्रष्टाचार हा एक मोठा मुद्दा होता. यापासून भाजपने शिकण्याची आवश्यकता आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना उमेदवारी देऊ नये, असेही संघाने सुचविले आहे.
स्थानिक पातळीवर खंबीर नेतृत्व
भाजपला विधानसभा निवडणुकांमध्ये आपला पाया व्यापक करायचा असेल तर स्थानिक पातळीवरचे नेतृत्व विकसित झाले पाहिजे. केवळ एकाच नेत्याच्या नावाने प्रत्येक निवडणूक जिंकता येणार नाही. स्थानिक पातळीवर नवे प्रभावी आणि दमदार नेतृत्व निर्माण करण्यासाठी नेत्यांचा शोध घेतला पाहिजे. पक्षात नेत्यांची नवी पिढी निर्माण करण्याचे कार्य हाती घ्या, असेही सुचविण्यात आले आहे.