नागरिकांसह जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई : पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण, बंधाऱ्यांमधील पाणीही आटल्याने भटकंती
वार्ताहर /नंदगड
खानापूर तालुक्यातील नदी-नाल्यांनी तळ गाठल्यामुळे माणसांसह जनावरांना पिण्याच्या पाण्याची काही ठिकाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खानापूरची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी मलप्रभा नदी तालुक्याच्या मध्यातून वाहते. कणकुंबी, मोदेकोप, असोगा, खानापूर, चापगाव, जळगे, पारिश्वाड भागातील जनता मलप्रभा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. मलप्रभा नदीवर जागोजागी बंधारे बांधण्यात आले आहेत. बंधाऱ्यातून पाणी अडविण्यात आले आहे. परंतु कडक उन्हामुळे बंधाऱ्यामधील पाणी आटले आहे. तर नदीच्या काही स्त्राsतातील डोहातून थोडेफार पाणी शिल्लक आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांच्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या काहीअंशी दूर झाली आहे असे वाटत असतानाच यावर्षी मार्चमध्येच नद्यांनी तळ गाठल्याने आत्तापासूनच जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील नदी-नाले व तलावांनी तळ गाठला आहे. खानापूर तालुक्यात 250 हून अधिक तलाव आहेत. पावसाळ्dयात पावसाच्या पाण्यामुळे या तलावातून पाणी साठते. त्यामुळे या पाण्याचा उपयोग शेतीसाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी होतो. जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत तलावातून पाणी राहते. त्यानंतर तलावातील पाणी आटते.
नदी-नाले बनले कोरडे
नंदगड, हलगा, बिडी, भागात तट्टी नाला आहे. पण हा नाला गेल्या दोन महिन्यांपासून पूर्ण आटला आहे. त्यामुळे या भागातील जनतेची पाण्याविना गैरसोय होत आहे. झुंजवाड, कसबा नंदगड, भुत्तेवाडी या भागातून एक लहान नाला जातो. या नाल्यातील पाणी जानेवारीत पूर्णत: आटते. माचीगड, हलसाल भागात असलेल्या नाल्याचे पाणी कमी झाले आहे. तसेच सुल्लेगाळी, देवराई, रेडेकोंडी भागातून वाहणाऱ्या नाल्यानेही तळ गाठला आहे. मास्केनट्टी, भुरुणकी भागातून वाहणाऱ्या नाल्याची अवस्था याहून वेगळी नाही. खानापूर तालुक्याच्या शिरोली, गर्लगुंजी, देवलत्ती तिवोली, नागरगाळी, कुंभार्डा आदी भागातून वाहणारे नाले कोरडे पडले आहेत. तालुक्याच्या अन्य भागात लहान मोठे नाले आहेत. त्या नाल्यातील पाणी कमी झाले आहे. कापोली भागातून वाहणाऱ्या पांढरी नदीतील पाणी कमी झाले आहे.
जंगल भागातील तळी पूर्ण कोरडी
खानापूर तालुक्याच्या जांबोटी, कणकुंबी, शिरोली, हेम्माडगा, नेरसा, निलावडे, गुंजी, लोंढा, कापोली, नागरगाळी आदींसह तालुक्यात निम्म्याहून अधिक भाग जंगलांनी व्यापला आहे. जंगलातील जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वनविभागांनी जंगलात ठिकठिकाणी लहान तळी खोदली आहेत. पण ती तळीही पूर्ण आटली आहेत. त्यामुळे वन्यप्राणी व पशु पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिणामी जंगलातील प्राणी लोकवस्तीत शिरताना दिसत आहे.
जनावरे पडताहेत आजारी
मलप्रभा नदीच्या पात्रातील काही डोहातून अत्यल्प पाणी शिल्लक आहे. या पाण्यात पालापाचोळा व वाळू मिश्रित माती साचली आहे. पाणी दूषित बनले आहे. तहानलेले पक्षी व जनावरे हे पाणी पित आहेत. हे पाणी पिल्यामुळे काही ठिकाणी जनावरे आजारी होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांतून ऐकावयास मिळत आहेत.