प्रतिनिधी /खानापूर
असोगा रस्त्यावरील रेल्वेस्टेशननजीक असलेल्या फाटकाजवळील भराव खचला होता. याची रेल्वे प्रशासनाने दुरुस्ती सुरू केली असून वाहतुकीसाठी रस्ता योग्य करण्याचे काम हाती घेतले आहे. याबाबत ‘तरुण भारत’ने छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते.
रेल्वे स्टेशनजवळील असोगा रस्त्यावरील फाटकाच्या पश्चिमेला भराव टाकून नव्याने रस्ता करण्यात आला होता. पावसाने हा भराव खचून गेल्याने रस्ता अरुंद झाला होता. येथून वाहतूक करणे धोकादायक होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. यामुळे ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने हा खचलेला रस्ता मुरुम व खडी घालून वाहतुकीस योग्य केला आहे. याबाबत असोगा, मन्सापूर, कुटिन्होनगर येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नोव्हेंबरमध्ये येथे भुयारी मार्गाचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन या रस्त्याची डागडुजी करत आहे.