क्षेत्र कोणतेही असो, खेळ कोणताही असो, त्यात यश मिळवायचे असेल तर दोन बाजू खूप महत्त्वाच्या असतात. एक बाजू म्हणजे त्याग आणि दुसरी बाजू म्हणजे समर्पण! दोनच दिवसांपूर्वी मध्यप्रदेश संघाने बलाढय़ मुंबईचा धोबीपछाड करत ऐतिहासिक रणजी स्पर्धा जिंकली, त्यावेळी जणू याचाच प्रत्यय आला. एकही स्टार खेळाडू नसलेल्या चेहऱयामोहऱयांचा हा संघ जेतेपदापर्यंत कसा पोहोचला, यासाठी त्यांनी कोणकोणते त्याग, समर्पण केले, त्याची ही थोडक्यात झलक!
स्वतःच्या विवाहासाठी केवळ 2 दिवसांची सुटी मंजूर झालेला आदित्य श्रीवास्तव!
मध्यप्रदेशला ऐतिहासिक रणजी जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा कर्णधार आदित्य श्रीवास्तवचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित मुक्तकंठाने प्रशंसा करत आले आहेत. एरवी, चंद्रकांत पंडित व आदित्य यांच्यात अगदी बाप-लेकासारखा स्नेह असतो. पण, ज्यावेळी शिस्त आवश्यक असते, त्यावेळी चंद्रकांत पंडित कोणतीही सूट देत नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आदित्य श्रीवास्तवने त्याच्या स्वतःच्या विवाहासाठी 10 दिवसांची सुटी मागितली असता चंद्रकांत पंडित यांनी केवळ दोनच दिवसांची सुटी मंजूर केली आणि विवाहाचे सोपस्कार पूर्ण करुन संघात दाखल होण्याची सूचना केली. आदित्यने ठरल्याप्रमाणे दोन दिवसात संघात दाखल होण्यापूर्वी आपल्या पत्नीला आणि कुटुंबियांना समजावून सांगितले की ‘आम्ही एका मोहिमेवर आहोत. रणजी स्पर्धा जिंकण्याची संधी सारखी-सारखी मिळत नसते’.
आता आदित्य रणजी जिंकण्याची मोहीम फत्ते करुन घरी परतला आहे आणि केलेले त्याग-समर्पणही सार्थकी लागले आहे!
तब्बल 9 वर्षांनंतर घरी परतलेला फिरकीपटू कुमार कार्तिकेय!
यंदा संपादन केलेल्या रणजी जेतेपदामुळे कुमार कार्तिकेयची एक तपश्चर्या यशस्वी झाली, जी त्याने 9 वर्षांपूर्वी सुरु केली होती. मूळ उत्तरप्रदेशमध्ये राहणाऱया कुमार कार्तिकेयने क्रिकेटमध्ये काही तरी घडवल्यानंतरच घरी परतेन, असा दृढनिश्चय करुन त्यावेळी घर सोडले होते आणि त्याचा हा निश्चय यंदा रणजी जेतेपदासह सफल झाला! पण, त्याचा हा प्रवास काटय़ाकुटय़ांनी भरलेला होता, हे ही तितकेच खरे.
त्याने प्रारंभी उत्तरप्रदेश संघाकडून खेळण्यास सुरुवात केली. पण, त्यात त्याला यश आले नाही. नंतर तो दिल्लीला गेला. तिथेही निराशा पदरी आली. पुढे प्रशिक्षक संजय भारद्वाज यांच्या सूचनेनुसार त्याने मध्यप्रदेशची रेल्वे पकडली आणि हाच त्याच्यासाठी कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट ठरला. प्रारंभी त्याला मध्यप्रदेश रणजी संघात आणि नंतर आयपीएल प्रँचायझी मुंबई इंडियन्स संघात स्थान लाभले.
आपल्या प्रवासाबद्दल तो म्हणतो, ‘क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवल्यानंतरच घरी परतेन, असा निश्चय केला होता, तो यशस्वी झाला. आई-वडिलांशी जेतेपदानंतर बोलणे झाले आणि आता काही कामानिमित्त मी विदेशी जात आहे. ऑगस्टमध्ये मी घरी परतेन त्यावेळी तो माझ्यासाठी भावूक क्षण असेल’!
झोपडीत राहून दिवस काढणारा राहुल बाथम!
मध्यप्रदेश रणजी संघात समाविष्ट युवा खेळाडू राहुल बाथम रोशनपुरा भागातील झोपडपट्टय़ात रहायचा. वडिलांची कमाई खूपच कमी होती. पण, तरीही राहुलची क्रिकेटची आवड जोपासण्यासाठी त्यांनी काहीही कमी पडू दिले नाही. त्याच्यासाठी सारे किट खरेदी करुन दिले. आश्चर्य म्हणजे या झोपडपट्टय़ात राहूनच राहुल भारतातर्फे यू-19 वर्ल्डकप खेळला. नंतर त्याने उत्तम वस्तीत घर घेतले. सध्या तो शासकीय सेवेत रुजू झाला असून रणजीतील लक्षवेधी योगदानामुळे देखील तो अर्थातच सुखावला आहे.
पूर्ण कुटुंब हैदराबादेत, शुभम मात्र इंदोरमध्ये!
मध्यप्रदेशच्या रणजी जेतेपदाचा आणखी एक शिल्पकार शुभम शर्मा मूळचा हैदराबादचा. पण, चक्क सरावासाठी तो इंदोरमध्येच राहतो. इंदोरमध्ये प्रशिक्षण शिबिर असताना मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेतर्फे जेवणा-खाण्याची सोय केली जाते आणि इतरवेळी तो हॉटेलवर अवलंबून असतो.
सारे कुटुंब हैदराबादमध्ये असताना इंदोरमध्ये एकटे राहणे कठीण होते. पण, त्याची पोचपावती आता मिळते आहे, असे तो आपल्या त्याग व समर्पणाबद्दल बोलताना म्हणतो!