संत तुकारामांचा गृहस्थाश्रम
तुकारामांचा पहिला विवाह रखुमाईबरोबर झाला होता, पण ती दमाग्रस्त होती म्हणून त्या काळच्या स्थितीनुसार माता-पित्यांनी तुकारामांचा दुसरा विवाह करण्याचे निश्चित केले. त्यावेळी त्यांची आर्थिक, सामाजिक स्थितीही उत्तम होती. पुण्यातील धनवंत अप्पाजी गुळव्यांच्या वयात आलेल्या कन्येबरोबर तुकारामांचे दुसरे लग्न लावून देण्यात आले. तिचे नाव जिजाई होते आणि आवली या नावानेही तिला लोक ओळखत असत. जेव्हा तुकारामांचा दिवसरात्र वेळ विठ्ठल चिंतनामध्ये आणि प्रवचन कीर्तनामध्ये जाऊ लागला तेव्हा आवलीला ते पसंत पडले नाही. पण तुकाराम आता पांडुरंगाच्या प्रेमात पडले होते.
देहूमधील तुकारामांच्या घरासमोर तुळशीवृंदावन होते. त्यासमोर ते नामस्मरण करीत बसत असत. एकदा एकादशीच्या दिवशी काही वैष्णवजन तुकारामांच्या घरी हरिकथा ऐकण्यासाठी आले. तुकाराम नामस्मरण करीत ध्यानस्थ बसले होते, त्याचवेळी आवलीने त्या लोकांना रागावून हाकलून दिले. ही घटना समजल्यावर तुकाराम आवलीला म्हणाले कोण घरा येते आमुच्या कशाला । काय ज्याचा त्याला नाही धंदा ।।1।। देवासाठी झाले ब्रह्मांड सोईरे । कोमळ्या उत्तरे काय वेचे ।।2।। माने पाचारिता नव्हे आराणूक । ऐसे येती लोक प्रीतीसाठी।।3।। तुका म्हणे XX नावडे भूषण । कांतेलेसे श्वान लागे पाठी ।।4।। अर्थात ‘आमच्या घरी कोण कशाला येतात? ज्याचे त्याला उद्योग काय कमी आहेत? विठ्ठलाच्या संबंधाने सर्व जगातील लोक आपले नातेवाईक बनले आहेत. त्यांच्याशी मधुर भाषण केल्याने, तुझे काय खर्च होते? ज्यांना मोठ्या सन्मानाने बोलावल्यावर सुद्धा न जाणारे लोक आपल्याकडे मोठ्या प्रेमाने ईश्वरासाठी येतात. तुकाराम महाराज आपल्या पत्नीला म्हणतात, तुला संत-महात्मे घरी आल्याचे भूषण का वाटत नाही? संतापलेल्या कुत्र्यासारखी ज्यांच्या त्यांच्या अंगावर का निष्कारण भुंकतेस (रागावतेस)” हे तुकारामांचे शब्द ऐकून आवली शांत झाली आणि पतीचे ऐकण्याचे तिने कबुल केले. पण तिला घाबरून त्यांच्या घरी लोकांचे येणे बंद झाले.
तुकाराम एकदा आपल्या घरासमोरील तुळशी वृंदावनासमोर बसले असताना, आवलीला म्हणाले “आता आपण एकाग्र चित्ताने कीर्तन श्रवण करू ये.” आवलीने विचार केला, मी आता नाही म्हणू शकत नाही, मी तसे वचन दिले आहे, म्हणून ती तिथे बसली. तुकारामांनी या एकांतवासाची संधी साधून आवलीला उपदेश केला. ते म्हणाले, नको धरू आस व्हावे या बाळांस । निर्माण ते त्यांस त्यांचे आहे ।।1।। आपुला तू गळा घेई उगवूनि। चुकवीं जांचणी गर्भवास।।2।। ऐवज देखोनि बांधीतील गळा । म्हणोनी निराळा पळतसें ।।3।। देखोनियां त्याचा अवघड मार। कांपे थरथर जीव माझा।।4।। तुका म्हणे जरी आहे माझी चाड। तरी करीं वाड चित्त आतां ।।5।। अर्थात ‘माझ्या मुलांना हे मिळावे ते मिळावे, अशी आशा तू धरू नकोस. त्यांच्यासाठी जे त्यांच्या प्रारब्धानी निर्माण झाले आहे, ते त्यांना मिळेलच. या सर्व मोहातून तू आपली सुटका करून घे आणि गर्भवासादी दु:खे नाहीशी कर. आपल्याजवळ कांही संचय दिसल्यास यमदूत आपला गळा बांधतील असे जाणून मी सर्वांचा त्याग करून पळत आहे. त्यांची ती अवघड शिक्षा पाहूनच माझ्या जीवाचा नुसता थरकाप होतो. जर तुला माझी खरोखरच जरुरी असेल तर हे सर्व विचार करून आपले मन मोठे कर व धैर्य धर”
सुख हे नावडे आम्हा कोण्या बळे । नेणसी आंधळे जालीसी तू ।।1।। भूक तहान कैसी राहिली निश्चळ । खुंटले चपळ मन ठायी ।।2।। द्रव्य जिवाहूनी आवडे या जना । आम्हांसी पाषाणाहूनी हीन ।।3।। सोईरे सज्जन जन आणि वन । अरघे समान काय गुणे।।4।। तुका म्हणे आम्हा जवळीच आहे । सुख दु:ख साहे पांडुरंग ।।5।। अर्थात “कुठल्याही बळाने आम्हाला हे संसारसुख कधीच आवडणार नाही. परमार्थाचे रहस्य न समजण्याइतकी तू आंधळी असल्यामुळे तुला हे कळत नाही. हरिनामाच्या आनंदाने आमची तहान भूक शांत झाली आहे व चंचल मन श्रीकृष्णाच्या चरणी स्थिर झाले आहे. या संसारी लोकांना द्रव्य प्राणापेक्षाही श्रेष्ठ वाटते. ते द्रव्य आम्ही दगडापेक्षा हीन समजतो. आपले नातेवाईक, सज्जन, दुर्जन, जन आणि वन हे आम्हाला कोणत्या कारणाने सारखे वाटतात याचा थोडा अंतर्मुख वृत्तीने विचार कर. पांडुरंग आमच्या जवळ राहतो व तोच आम्हाला सुख, दु:ख सहन करण्यास साहाय्य करतो.”
देव पहावया करी वो सायास। न करी हे आस नाशिवंत ।।1।। दिन शुद्ध सोम सकळी पातला। द्वादशी घडला पर्वकाळ ।।2।। द्विजा पाचाऊनि शुद्ध करी मन। देई वो हे दान यथाविध ।।3।। नको चिंता करू वस्त्राया पोटाची । माउली आमुची पांडुरंग।।4।। तुका म्हणे दुरी सांगती पाल्हाळी । परी तो जवळी आहे आम्हा ।।5।।
अर्थात “प्रत्येक ठिकाणी भगवंताला पाहण्याचा प्रयत्न कर आणि या नाशवंत प्रपंचाची आशा धरू नकोस. आज सोमवार आहे, प्रात:काळ आहे व द्वादशी तिथी आहे. त्यामुळे आजचा दिवस फार शुद्ध आहे हे जाणून ब्राह्मणांना बोलावून यथाविधी दान दे, आणि मन शुद्ध कर. अन्न-वस्त्रांची काही काळजी करू नकोस. आमची पांडुरंग माउली तुझा योगक्षेम चालविण्यास समर्थ आहे. पांडुरंग भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आहे असे वेदामध्ये व गीतेमध्ये सांगितले आहे, परंतु तो खरोखर आम्हा जवळच आहे, हे समजून घे.”
गुऊकृपे मज बोलविले देवे । होईल ते घ्यावे हित कांही ।।1।। सत्य देवे माझा केला अंगीकार । आणिक विचार नाही दुजा ।।2।। होई बळकट घालुनिया कास । हाती उपदेश तुज आता ।।3।। सडासंमार्जन तुळशी वृंदावन अतिथी पूजन ब्राह्मणांचे ।।4।। वैष्णवांची दासी होई सर्व भावे । मुखी नाम घ्यावे विठोबाचे ।।5।। पूर्ण बोध स्त्राr भ्रतार संवाद । धन्य जीही वाद आइकिला ।।6।। तुका म्हणे आहे पांडुरंग कथा । तरेल तो चित्ता धरी कोणी ।।7।। अर्थात “मी जे काही तुला सांगितले ते माझे बोल नसून गुरु व भगवंत यांनी कृपा करून माझ्याद्वारे बोलविले आहे. त्यातील जे हितकारक वाटते ते ग्रहण कर. खरोखरच पांडुरंगाने माझा अंगीकार केला आहे. याबद्दल माझ्या मनात मुळीच संशय नाही. तूदेखील धैर्याने कंबर कसून तयार हो. हाच तुला आता उपदेश आहे. तुळसी वृंदावनापुढे सडासंमार्जन कर. काया, वाचा, मनाने वैष्णवांची दासी हो. आणि नित्य पांडुरंगाचे नामस्मरण करत जा. या पती -पत्नीच्या संवादामध्ये परमार्थाचा बोध असून, ज्याने हा संवाद ऐकला ते धन्य होत. या संवादात पांडुरंगाची कथा आहे, जो कोणी या उपदेशाचे पालन करील तो भवसागर तरुन जाईल”
अशाप्रकारे आवलीला तुकारामांनी मनुष्य जीवनाचे ध्येय म्हणजे केवळ स्वत:ची इंद्रिय तृप्ती नसून भगवंत व त्यांचे वैष्णव भक्त यांची सेवा करणे आहे हे समजावून सांगितले. जो कोणी, हा तुकारामांनी आवलीला दिलेला उपदेश आपल्या जीवनात पालन करेल, तो मग गृहस्थाश्रमात असूनसुद्धा भगवंतावर प्रेम करू शकेल आणि ज्या प्रेमाच्या शोधात आहोत त्याचा सुखद अनुभव आम्ही घेऊ शकू.
-वृंदावनदास