मराठा आरक्षणासाठीच्या दुसऱ्या आणि महत्वाच्या टप्प्य़ावर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आज कोल्हापूरात सकल मराठा समाजाकडून शिंदे फडणवीस सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. काळ्या फिती बांधून सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्य़ा. सरकारने मराठा समाजाला फसवले आहे, हे आंदोलन म्हणजे फक्त ट्रेलर आहे, यापुढे मराठा समाजाकडून मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मनोज जरांगे- पाटील यांनी मराठा आंदोलनासाठी सरकारला 40 दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. दसऱ्याच्या शेवटी सिमोल्लंघन दिवशी सरकारची ही मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपले उपोषणाचे हत्यार पुन्हा उपसले.
दरम्यान, आज कोल्हापूरात सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठींबा देऊन शिंदे- फडणवीस सरकारविरुध्द निदर्शने करण्यात आली आहेत. सकल मराठा समाजाने यावेळी शिंदे- फडणवीस सरकार फसवे असल्याचे सांगून सरकार विरूद्ध घोषणा दिल्या.
मराठा आरक्षणासाठी सकल मराठा आंदोलकांकडून ‘शिंदे- फडणवीस सरकार..चलेजाव’च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच नरेंद्र मोदी सरकार…चले जाओ च्या घोषणाही यावेळी आंदोलकांकडून देण्यात आल्या. तसेच ‘एक मराठा…लाख मराठा’ ‘आरक्षण आमच्या हक्काचं…नाही कुणाच्या बापाची’ असेही आंदोलकांकडून सरकारला बजावण्यात आले.
स्वतःच्या बापाला फसवून सत्तेवर आलेलं हे सरकार नक्कीच मराठा समाजाची फसवणूक करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा असून भाजपच्या वळचणीला पडलेले आहेत. कोल्हापूरातील आजचे आंदोलन हा फक्त ट्रेलर आहे. सरकारने आरक्षणासाठी कोणत्याच हलचाली केल्या नाही तर येत्या काळात मोठे जनआंदोलन करण्य़ात येईल असा इशारा बाबा इंदुलकर यांनी दिला. आंदोलनात शिंदे यावेळी विजय देवणे, बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, यांच्या बरोबर अनेक कार्यकर्ते आंदोलनासाठी उपस्थित होते