तांदळामध्ये स्टार्चचे प्रमाण अधिक असते. साहजिकच मधुमेह इत्यादी आजारांवर भात कमी खा, असा सल्ला दिला जातो. मात्र, उत्तर प्रदेशामध्ये तांदळाचे एक वाण असे आहे, की ज्यामध्ये साखर नसल्यात जमा आहे. हा तांदूळ लांबसडक आणि रंगाने काळा असतो. त्याचा दाणा पांढऱया रंगाचा असला तरी त्यामध्ये स्टार्चचे प्रमाण नगण्य आहे. हा औषधी तांदूळ म्हणून ओळखला जातो. गेल्या तीन-चार दशकांमध्ये भरघोस पीक देणाऱया तांदळाच्या नव्या संकरित जाती बाजारात आल्याने या तांदळाकडे दुर्लक्ष होऊन तो विस्मरणात गेल्यासारखा झाला होता. तथापि, पारपंरिक वाणांचे संरक्षण करणाऱया काही संशोधकांनी आता या तांदळाला नवसंजीवनी दिली आहे. भारतात मधुमेह रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे लोकांच्या आहारविषयक संकल्पनांमध्येही सकारात्मक परिवर्तन घडत आहे. संकरित तांदूळ खाण्यापेक्षा शरीरातील साखर न वाढविणारा पारंपरिक वाणाचा तांदूळ अधिक प्रमाणात उपयोगात आणला जात आहे. त्यामुळे या काळय़ा भाताला मोठी मागणी निर्माण झाली आहे. आता याचे जास्त उत्पादन कसे घेता येईल, यावर संशोधन सुरू असून त्याला मोठे यशही मिळाले आहे.
या काळया तांदळापासून केवळ खाण्याचा भातच नव्हे तर ब्रेड आणि आईस्क्रीमही बनविण्याची कृती विकसित करण्यात आली आहे. या भाताचे पदार्थ खाल्ल्यास शरीरात साखर फारशी वाढत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी हा रुचकर तांदूळ जणू वरदानच मानला जात आहे. या तांदळाचे इतर अनेक लाभ आहेत. तो लवकर शिजतो, त्यामुळे इंधन कमी लागते. त्याची नैसर्गिक चव संकरित तांदळापेक्षा चांगली आहे. त्यापासून अनेक पदार्थ बनविता येतात. नीती आयोगानेही या तांदळाच्या प्रसारासाठी पावले उचलली आहेत. उत्तर प्रदेशात हा तांदूळ ‘कालानमक’ या नावाने ओळखला जातो. याचे एकरी उत्पादन संकरित तांदळापेक्षा कमी असले तरी त्याचे लाभ अनेक असल्याने त्याचे उत्पादन शेतकऱयांसाठीही फायद्याचे असल्याचे दिसून येत आहे.