पीएचडी प्राप्त नाऊ वरक यांचे प्रतिपादन; सावंतवाडीत परुळेकर क्लिनिकमध्ये सत्कार
सावंतवाडी : प्रतिनिधी
शिक्षणामुळे जीवनाकडे, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक बनतो. शिक्षणाद्वारे आपण समाजात बदल घडवून आणण्यासाठी रचनात्मक काम करु शकतो. असे मत सावंतवाडीचे सुपुत्र तथा गोवा शासकीय महाविद्यालयाचे असिस्टंट प्राध्यापक नाऊ वरक यांनी येथे केले. माडखोलसारख्या ग्रामीण भागातील नाऊ वरक यांनी रुईया आणि नवी दिल्ली येथील जेएनएनयू कॉलेजमध्ये प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन गोवा शासकीय महाविद्यालयात असिस्टंट प्राध्यापक म्हणून रुजू झाले .त्यांनी अलीकडे पीएचडी केली. याबद्दल त्यांचा सावंतवाडीतील परुळेकर क्लिनिकमध्ये सिंधुरत्न फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला .त्यांच्या या प्रवासात डॉ जयेंद्र परुळेकर यांनी योग्य मार्गदर्शन केले. तर ,मुंबईतील हिंदू कॉलनीतील बाळासाहेब पंतवालवकर यांच्या कुटुंबाने त्यांना उच्च शिक्षणाच्या काळात निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली .तर राजेंद्र फातर्पेकर, पत्रकार समर खडस ,सामंत यांनी त्यांना वेळोवेळी मदत केली. त्याचा आवर्जून उल्लेख करत नाऊ वरक यांनी या सर्वांबाबत कृतज्ञता व्यक्त केली.माडखोलसारख्या ग्रामीण भागातील माझ्यासारख्या विद्यार्थ्याला डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांचे योग्य मार्गदर्शन वेळीच लाभल्याने माझा उच्च शिक्षणाचा प्रवास सुकर झाला. खरे तर मी डीएड किंवा बीएड करून कुठेतरी जिल्ह्यातच नोकरी करण्याच्या विचारात होतो .परंतु डॉक्टर परुळेकर यांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे मुंबईच्या कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेऊ शकलो. मला आयएएस ऑफिसर व्हायचे होते . परंतु, रूईया कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तत्त्वज्ञान ,राज्यशास्त्र या विषयांशी संपर्क आला. त्यामुळे माझा दृष्टिकोन बदलला. .समाजासाठी रचनात्मक काम करण्याच्यादृष्टीने मी शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यानंतर मी जेएनएनयू कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. तेथून गोव्यामध्ये शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झालो तसेच पीएचडी केली. शिक्षणामुळे माणसाच्या जीवनात व्यापक बदल होतो .समाजाकडे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो . त्यामुळे शिक्षण फार महत्त्वाचे आहे .मी ज्या समाजातून आलो आहे .हा समाज तसेच अन्य समाज अद्यापही दबलेले आहेत. आतापर्यंत ठराविक जातीपुरता इतिहास लिहिला गेला आहे. दबलेल्या समाज घटकांचा इतिहास दुर्लक्षित आहे .हा इतिहास लिहिण्याचा माझा मानस आहे. समाजामध्ये रचनात्मक बदल घडवून आणण्यासाठी इतिहास समजून घेणे महत्त्वाचे आहे .भारतातील राजकीय इतिहास पाहिला तर त्यावर ठराविक जातींचा पगडा दिसतो .इतर जाती त्यात दिसत नाही .याबाबत लेखन करणे आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य महान आहे. त्यांनी वैचारिक लिखाण करून समाजात जागृती निर्माण केली होती असे नाऊ वरक यांनी सांगितले पश्चिम भारतातील वंचित घटकांचा इतिहास लिहिण्याचा आपला मानस आहे असे वरक यांनी स्पष्ट केले. डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी नाऊ वरक यांचा प्रवास विशद केला. नाऊ वरकला आयएएस ऑफिसर व्हायचे होते. त्या दृष्टिकोनातून आवश्यक ती मदत केली .तो आयएएस होऊ शकला नसला तरी त्याने उच्च शिक्षण घेऊन स्वतःला सिद्ध केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास जीवनात कर्तुत्ववान व्यक्ती घडू शकतो हे नाऊ वरकने सिद्ध केले आहे .त्याच्या जिद्दीला खरोखरच सॅल्यूट केला पाहिजे. असे असंख्य विद्यार्थी यापुढे जिल्ह्यात निर्माण झाले पाहिजेत त्याचा फायदा समाजाला होणार आहे. प्रास्ताविक डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत डॉ.किरण गुजर यांनी केले. नाऊ वरक , बाळासाहेब पंतवालावलकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळेस बाळासाहेब पंतवालावलकर ,डॉ सुखानंद भागवतडॉ संजय सावंत,डॉ निर्मला सावंत,डॉ मृदुलामहाबळ,डॉ.राहुल पंतवालावलकर ,डॉ चिंडक पाटील ,वी के सावंत, कणकवली दादा मडकईकरनकुल पार्सेकर ,दिलिप निर्गुण,आनंद परूळेकर,महेश परूळेकर आदी उपस्थित होते.