गावकर्यांचा विरोध असताना सुद्धा वीज कंपनीचे कार्यालय नेले गावाच्या बाहेर
वाळवा / प्रतिनिधी
वाळवा येथील वीज कंपनीचे शाखा अभियंता प्रसाद कुलकर्णी दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात अडकले असून, त्यांनी वाळवा गावाला वेठीस धरले आहे. त्यांच्या अनागोंदी कारभाराला स्थानिक लोक व नेतेमंडळी कंटाळलेले आहेत. या वादग्रस्त व्यक्तीबद्दल ग्रामस्थांच्यामधून तीव्र भावना व्यक्त होत असून. लोकप्रतिनिधी, वीज ग्राहक, नागरिक सर्वच स्तरामधे संतप्त भावना व्यक्त होत आहेत. यावर वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कुलकर्णी यांची अन्यत्र बदली करावी. अन्यथा गावातील लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
प्रसाद कुलकर्णी हे गेल्या चार वर्षांपासून वाळवा येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कार्यभार घेतल्यापासून वीज कंपनीच्या कारभारामध्ये तणावाचे वातावरण राहिले आहे. गावातील ग्रामस्थ-वीज ग्राहक, लोकप्रतिनिधी, नेते, कार्यकर्ते यांच्याशी ते नीट बोलत नाहीत. त्यांच्या वागण्यामध्ये मी पणा लोकांना जाणवतो. ते हेकेखोरपणाने व हट्टाग्रही वागणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे कार्यालयांमध्ये सातत्याने खटके उडताना दिसत आहेत.
कोरोना महामारी, महापुरर या कालावधीमध्ये वीज कंपनीची बिले लोकांच्या कडून थकली होती, त्याचप्रमाणे गावातील मंदिरे व जिल्हा परिषद शाळा यांची बिले ही थकली होती. अशा प्रसंगी गावचे सरपंच, उपसरपंच व स्थानिक नेतेमंडळी यांनी प्रसाद कुलकर्णी यांना मंदिरांची आणि शाळांची वीज तोडू नका, घरगुती कनेक्शन तोडले तरी चालतील असे सांगूनही त्यांनी शाळा आणि मंदिरातली वीज हट्ट करीत बंद करून टाकली. त्यामुळे मंदिरे अनेक दिवस अंधारात होती, जिल्हा परिषद शाळा अंधारात होत्या. त्यावेळी ग्रामपंचायतच्या मिटिंगमध्ये सुद्धा कुलकर्णींचा ग्रामस्थ, गावातील नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांच्यासमवेत वाद झाला, या वादाचे कारण करीत वाळवा येथील वीज कंपनीचे कार्यालय कुलकर्णी यांनी गावकर्यांचा विरोध असताना सुद्धा एका रात्रीत गावाच्या बाहेर तीन किलोमीटर नेऊन ठेवले.