ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari ) आज राज्य सरकारला ३० जुलै अर्थात गुरुवारी बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावं अशा आशयाचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) पाठवले आहे. आता उद्धव ठाकरे सरकार बहुमत चाचणीला सामोरं जाणार की उद्धव ठाकरे थेट राजीनामा देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. सत्तेसाठी भाजपकडून वेगवान घडामोडी करत चमत्कार घडवला आहे. राज्यपाल इतक्या वेगाने काम करतात हेसुद्धा कळलं. भाजप संविधानाच्या चिंधड्या उडवत आहेत. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागत आहे. आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आणि न्यायाची मागणी करू असंही राऊतांनी म्हटलं.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी २४ तासाची मुदत दिली आहे. याविरोधात शिवसेना आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. राऊत म्हणाले की, विरोधी पक्षाने रात्री पत्र दिलं आणि लगेच २४ तासात बहुमत सिद्ध करायला सांगतात. एवढं स्पीड? अडीच वर्षांपासून १२ आमदारांच्या नियुक्तीची फाइल पडून आहे. पण राज्यपाल याच वेळेची वाट बघत आहेत. त्यांना भाजपला १२ आमदारांचं गिफ्ट द्यायचं आहे. तसेच आमच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ११ तारखेपर्यंत त्यावर निर्णय होणार नाही. यादरम्यान असं काही घडलं, तर सर्वोच्च न्यायालयाने दाद मागण्याची मुभा दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर घडलेल्या वेगवान घडामोडींवर संजय राऊतांनी खोचक टोला लगावला आहे. “राफेलचा वेगही इथे कमी पडेल इतक्या वेगाने घडामोडी घडत आहेत. भाजपा हे सगळं करतेय याचा अर्थ त्या बंडखोरांना तोडण्यात भाजपाचाही हात असणारच. असं तुम्ही करत असाल तर तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ. जनता सगळं बघतेय. जनता शांत बसणार नाही”, असं राऊत म्हणाले.