ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दिल्लीतील भाजपच्या व्यापाऱ्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 80 आमदार फोडून त्यांच्या हाती राज्याच्या चाव्या दिल्या. लुटीचा खुला परवाना त्यांना दिला. हा देश बुडवण्याचाच प्रकार आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे आणि आता अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष त्यांना लावला. आता ते दिल्लीत बसून मजा बघत आहेत. देशबुडव्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची हास्यजत्राच केली आहे, अशी जळजळीत टीका खा. संजय राऊत यांनी केली.
राज्यातील घडामोडीवरून संजय राऊत यांनी सरकारमधील नेत्यांना दै. सामनातील रोखठोक सदरातून लक्ष्य केलं आहे. देशातील भाजपचे विरोधक देश बुडवणार आहेत, असा हल्ला पंतप्रधान मोदींनी भोपाळमधून केला आणि पुढच्या 72 तासांतच देश बुडवणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांनी भाजपशी हातमिळवणी करत मंत्रीपदाची शपथ घेतली. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची भाजपची तयारी दिसून येत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून राजकीय विरोधकांचे पक्ष उद्ध्वस्त करण्याची त्यांना चटक लागली आहे.
अजित पवारांसह जवळपास 40 आमदारांना भाजपात घेऊन ‘पवित्र’ करण्यात आले. याआधी असे अनेक देशबुडवे भाजपने पवित्र करून घेतले. नव्याने भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांना आता शांत झोप लागेल. केंद्रीय यंत्रणांचा वापर राजकीय हत्यारासारखा सुरू आहे. पाकिटमारांना तुरूंगात टाकायचे आणि दरोडेखोरांना भाजपात प्रवेश देऊन शुद्ध करायचे असे एकंदरीत धोरण आहे. कालचे देशबुडवे एका रात्रीत देशभक्त कसे होतात ते महाराष्ट्रात दिसले. जे भाजपात गेलेत त्यांची टेबलावरची फाईल कपाटात जाईल. पण बंद कधीच होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.