ऑनलाईन टीम / तरुण भारत :
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दाढी मान्य नव्हती. दाढी वाढवणं आपलं काम नाही, व्यवस्थित राहायचं, असे सावरकर म्हणायचे. मग सावरकरांच्या नावाने गौरव यात्रा काढणारे मुख्यमंत्री शिंदे आपली दाढी काढून फिरणार आहेत का? असा खोचक सवाल खा. संजय राऊत यांनी उपस्थित केला.
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे. त्यावरुन राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागले. राऊत म्हणाले, भाजप आणि शिंदे गटाने सावरकर यात्रा जरुर काढावी. त्यापूर्वी त्यांनी वीर सावरकरांचे साहित्य वाचले पाहिजे. सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार देताना पुरोगामी आणि विज्ञानवाद याचा महत्त्वाचा संदर्भ दिला, विज्ञानवाद हा त्यांच्या विचारसरणीचा पाया होता. त्यामुळे सावरकरांची विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन भाजप आणि मिंधे गट पाळणार असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे.
सावरकरांना शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नव्हते. ते म्हणायचे गाय हा केवळ उपयुक्त पशू आहे. गाय दूध देत नसेल तर गोमांस खायला हरकत नाही. भाजपला हे पटणार आहे का? त्यामुळे भाजप सावरकरवादी असूच शकत नाही, असेही राऊत म्हणाले.