वार्ताहर/कास
गेले विस दिवस सहयाद्रीच्या डोंगरमाथ्यावरील कास परीसरात सोसाट्याच्या वाऱ्यासोबत पावसाची मुसळधार सुरू असुन जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरांच्या भिंती कोसळुन पत्रे कौले ऊडून पडझड होऊ लागली असल्याने नागरीक भयभीत झाले आहेत.
सातारा तालुक्यातील जुंगटी गावाचे रहिवासी धुळाजी जानू कोकरे यांच्या राहत्या घराची भिंत शुक्रवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे अचानक कोसळली असून घराचे नुकसान झाले आहे. तसेच गावातील अन्य घरांचीही कौलेही वाऱ्याने उडून पडली आहेत. पावसामुळे जळकेवाडीतील ठकाराम रामचंद्र शिंदे यांच्या घराची भिंत कोसळली आहे. तर या गावाशेजारीच असणाऱ्या जावली तालुक्यातील कात्रेवाडी गावातील सुगंदा पांडुरंग सावंत यांच्या घराची भिंत कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.
मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांच्या पडझडी सोबतच या भागातील धावली, जुंगटी, तांबी, भांबवली, कास, पाली, जळकेवाडी, कात्रेवाडी, कारगाव, पिसाडी या गावातील विजपुरवठा गेले चार दिवस खंडीत झाल्याने नागरिकाेना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शेतीच्या बांधांचीही मोठया प्रमाणात पडझड झाली आहे. पाळीव गाई, म्हैशी आदी प्राणी थंडीने गारठून मरू लागल्याने शेतकरी चिंताग्रत झाला आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.