पतीसाठी, कुटुंबासाठी सावित्री लढताहेत तेव्हाही अन् आताही : परिस्थितीशी करताहेत दोन हात
मनीषा सुभेदार /बेळगाव
कोरोना येऊ दे किंवा युद्ध होऊ दे, महागाईचे चटके बसू देत की परिस्थितीचे फटके बसू देत, सत्यवानाची सोबत असू दे अथवा नसू दे, ‘सावित्रीच्या लेकी’ लढतच आहेत. सावित्रीने यमाकडून आपल्या पुण्याईच्या जोरावर सत्यवानाचे प्राण परत मिळविले. ही पौराणिक कथा असो किंवा दंतकथा असो, यावर विश्वास ठेवावा किंवा नाही हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि विचारधारेचा प्रश्न आहे. परंतु पतीसाठी, कुटुंबासाठी सावित्री तेव्हाही आणि आताही लढतेच आहे, हे वास्तव आहे.
कोरोनाने सर्वाधिक फटका बसला आहे तो स्त्रियांना. त्याचे अनेक वेगवेगळे पैलू आहेत. मात्र, कोरोनामुळे सत्यवानाची म्हणजेच जोडीदाराची साथ सुटली आणि त्याच्या मागे सावित्रींचा लढा अधिक तीव्र झाला आहे. प्रातिनिधिक स्वरुपात दोघी, तिघींशी संवाद साधला असला तरी कोरोनाने महिलावर्गाची परीक्षा घेतली असून दिवसागणिक ती अधिक बिकट होत आहे. मात्र, आता आपली जबाबदारी वाढली आहे याची जाणीव असणाऱया सर्वजणी हा लढा परिस्थितीशी दोन हात करून लढत आहेत. नवनवीन गृहोद्योग, भाजीविक्री, मेस चालविणे अशा कामांमधून कुटुंबाचा डोलारा सांभाळत आहेत.
लढा एकटीचाच….
त्यापैकीच एक आहेत जयशीला षण्मुख निंगण्णावर. निवडणुकीच्या कामासाठी म्हणून रामदुर्गला गेलेले षण्मुख येताना कोरोनासह आले आणि उपचारांचा उपयोग न होता जयशीलाची साथ सोडून गेले. जयशीला मूळच्या हिरेबागेवाडीच्या. त्यांचे शिक्षण पीयुसी टीसीएचपर्यंत झाले आहे. हायस्कूल शिक्षक असलेल्या षण्मुख यांच्याशी त्यांचा विवाह 14 मे 2005 मध्ये झाला. जयशीला सध्या कंग्राळी खुर्द येथील सरकारी शाळेत शिक्षिका आहेत.
बेळगाव विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आणि ‘इलेक्शन डय़ुटी‘ म्हणून षण्मुख रामदुर्गला गेले. येतानाच ताप घेऊन आले. तीन-चार दिवसांनंतरही ताप कमी झाला नाही म्हणून चाचणी केली ती कोरोना पॉझिटिव्ह आली. या दरम्यान कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होणे कठीण होते. बरीच यातायात करून त्यांनी पतीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु 22 मे 2021 रोजी षण्मुख यांनी जयशीलाची साथ सोडून जगाचा निरोप घेतला.
सातवीतील मुलगी आणि दहावीत असलेला मुलगा यांना शिक्षण देणे आणि त्यांच्या पायावर उभे करणे यासाठी जयशीलाची लढाई सुरू आहे. शिवाय उपचारासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर आहेच. नोकरीमुळे कर्ज कसे तरी फिटू शकेल. परंतु एकटीने लढा द्यायचा आहे ही जाणीव दररोज त्यांना कुरतडत राहते. मुलांसमोर खंबीरपणे उभे राहावे लागते. नोकरी करणे क्रमप्राप्तच असते. परंतु दोघांनी मिळून वाटून घेण्याची जबाबदारी एकटीवर आल्याने आपण निभावून नेऊ ना, अशी शंका जयशीला यांना भेडसावते.
हिचा लढाच वेगळा…
घर दोघांचं असतं, परंतु बऱयाचदा ते तिलाच सांभाळावं लागतं. खानापूरच्या कांचनकोप्प येथील शांतव्वा व्हंजी यांच्या बाबतीत असेच म्हणावे लागते. तो काळ मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देणारा नव्हता. त्यामुळे शांतव्वा शिकल्या नाहीत. आई-वडिलांनी लग्न करून दिले आणि हिरेबागेवाडी येथे त्या पतीसमवेत आल्या. लग्न होऊन 30 वर्षे झाली पण संसार सुख असे त्यांना फार काळ लाभले नाही.
त्यांचे पती महांतेश ट्रकचालक होते. अर्थातच ठिकठिकाणी त्यांची भ्रमंती होत असे. विजापूरला त्यांनी अन्य एका महिलेशी संधान बांधले आणि ते शांतव्वाकडे परतलेच नाहीत. मुलगा वडिलांबरोबर ट्रकवर गेला आणि त्याने वडिलांशी आईला फसविल्याबद्दल भांडण काढले. याच वादावादीमध्ये अपघात होऊन मुलाच्या पायाला जबरी मार बसला आणि हा मुलगा 21 वर्षांचा असून त्याला कुबडय़ांच्या आधाराने चालावे लागते.
महांतेश परतलेच नाहीत. तरी मुलाला मोठे करणे आणि मुलीचे लग्न करणे हेच शांतव्वा यांचे लक्ष्य राहिले. आज त्यांचा मुलगा रिक्षामधून शहापूरपर्यंत भाजी घेऊन येतो आणि आईसमवेत भाजीविक्री करतो. महांतेश यांचे निधन झाल्याचे वृत्त शांतव्वा यांना समजले तेव्हा त्यांनी कठोर मनाने हे वास्तव स्वीकारले. आता फक्त मुलाचे सर्व काही सुरळीत व्हावे, एवढीच त्यांची इच्छा आहे.
नियतीने घेतली परीक्षा…..
नियती माणसाची परीक्षा पाहत असते. अवघ्या तीन दिवसांच्या अंतरामध्ये सासरे आणि पती कोविडने दगावले. म्हणून मृदुला साखळकर (पूर्वाश्रमीच्या मोहिरे) यांची सुकर वाट बिकट झाली. बी.कॉम.नंतर लगेचच यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. पती झेरॉक्स आणि अन्य साहित्याचे दुकान चालवत होते. कोविड काळात सर्वत्र निर्जंतुकीकरण करण्याचे काम त्यांनी घेतले होते. याच कामासाठी खानापूरहून येताना ताप घेऊन आले. आपण त्यांना बाहेर पाठविले नाही. परंतु खोकला थांबण्याचे चिन्ह दिसेना म्हणून हॉस्पिटलला दाखल केले. तेव्हा ते परत येणार नाहीत, असे चुकूनही वाटले नव्हते. याची खंत मृदुला व्यक्त करतात.
बरीच खटपट करून कसेबसे हॉस्पिटल गाठले आणि एक बेड मिळविला. मुलीला आईकडे सोडले. दरम्यान, दीर आले. त्यांना आणि सासऱयांना लक्षणे जाणवली म्हणून चाचणी करता त्यांना आणि सासूलाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. या सर्व परिस्थितीत खंबीरपणे लढत होते. दिवस दिवस हॉस्पिटलच्या बाहेर थांबत होते. सासऱयांनासुद्धा दाखल केले. परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि त्या पाठोपाठ तीन दिवसांत कोरोनाने पतीना माझ्यापासून हिरावून नेले, असे त्या म्हणाल्या.
मी सतत हॉस्पिटलच्या वाऱया करत होते. त्यांना श्वासोच्छ्वासाला खूप त्रास होत होता. मी जे काही शक्मय आहे ते केले. परंतु अचानक गुंतागुंत होऊन ते निघून गेले आणि माझ्यासमोर प्रश्नांची मालिका उभी राहिली, असे सांगून मृदूला म्हणाल्या, ते होते तोपर्यंत मी सतत त्यांच्या समवेत असले तरी मला व्यवसायातले काहीही माहिती नव्हते. त्यांच्याबरोबर मी स्वतःला अत्यंत सुरक्षित समजत होते. अर्थात कुटुंब सावरावे लागणार यासाठी आता वेगवेगळय़ा हॉस्पिटल्सचे गणवेश शिवून देण्याचे काम करते, असे त्यांनी सांगितले.
संसार म्हटला की वाद होतात, अबोला होतो. परंतु जोडीदाराच्या साथीशिवाय संसार पूर्ण होऊ शकत नाही. त्यांची आठवण येत नाही असा क्षणही नाही. मात्र दुर्दैवाने परिस्थिती मी बदलू शकत नाही. तरीही वास्तव स्वीकारणे माझ्यासाठी आजही कठीण आहे, असे त्या सांगतात.
सावित्री लढत आहेतच. त्यांना सत्यवानांची साथ हवी आहे. त्याचवेळी सावित्रींनीही सत्यवानाला समजून घेण्याची गरज अधोरेखीत करावी असे वाटते. परस्परांतील संवाद आणि सामंजस्यानेच संसार फुलतो, हे नक्की!