जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबतीत मतभेद असू शकतील. मात्र त्यांच्या जिद्दीचे कौतुकच झाले पाहिजे. वयाच्या 82 व्या वषी ज्या जिद्दीने ते मुंबईतील रूग्णालयातून उपचार संपवून थेट शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले, त्या जिद्दीला तोड नाही. प्रकृती ठीक नसताना त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर काही मिनिटांचे भाषण केले. आपणास भाषण करणे शक्मय नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दहा-पंधरा दिवसानंतर आपण बोलू शकू असे सांगत त्यांनी उपस्थितांच्या मनात एक जिद्द पेरली. कर्करोगाने ग्रासलेले असतानाही दोन दशके त्यांनी झुंज दिली आहे. इतके मोठे आव्हानसुद्धा त्यांनी जिद्दीने परतवले आहे. पाच वर्षाहून अधिक काळ त्यांना अनेक संकटे आणि राजकीय आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र तरीही ते आपल्या भूमिकेपासून ढळलेले नाहीत. लोकशाही व्यवस्थेत संवादाला त्यांनी नेहमीच महत्त्व दिले आहे. विरोधी विचारांच्या व्यक्तीशीही घनि÷ संबंध ठेवायचे. मात्र, जेव्हा राजकीय विरोधाची वेळ येईल तेव्हा टोकाच्या संघर्षालाही सिद्ध व्हायचे, हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. सहकाराच्या बाबतीत प्रसंगी सत्तेतील नेत्याशी जुळवून त्यांनी राजकारणाला आकार दिला आहे. मात्र तरीही आपले म्हणून स्वतःचे एक वेगळे राजकारण पवार नेहमीच जपतात. प्रसंगी सत्तेविरुद्ध टोकाचा संघर्ष उभा करतात. त्याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या अखेरच्या सहा महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुरती वाताहात झाली होती. अनेक नेत्यांनी पक्ष सोडला, पक्षात राहून काहींनी आव्हान दिले होते. नात्यातील ज्ये÷ांनीही पक्ष सोडला होता. अशा काळातही न डगमगता ‘भाजप सरकार मी घालवणार’ असा मनोदय त्यांनी बोलून दाखवला होता. विशेष म्हणजे त्यावेळी समोरून ‘आमच्याशी लढायला आता पैलवान शिल्लक नाही’, असे सांगितले जात होते. वास्तवही तसेच होते. पक्षातील बडे बडे नेते हतबल झाले होते. अशा काळात पवारांनी नव्या दमाच्या युवकांची टीम उभी केली. धाडसाने लढणारांच्या खांद्यावर जबाबदारी दिली. या दरम्यान एका याचिकेवरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या गुन्ह्य़ाचा आधार घेत ईडीने शरद पवार यांची चौकशी सुरू असल्याचा आभास निर्माण केला. खरे तर ईडीची चौकशी मागे लागली म्हटल्यानंतर भलेभले डगमगतात, हे अलीकडच्या काळात प्रकर्षाने जाणवले असताना, शरद पवार यांनी त्याला संधीत बदलले. निवडणुकीच्या आधी माझी चौकशी करा, प्रचारावेळी वेळ नाही, त्यासाठी मी अमुक या दिवशी तुमच्या कार्यालयात हजर होईन, असा निरोप त्यांनी दिला आणि सरकार गडबडले. चित्र पालटले. पायाला बँडेज बांधून ते राज्यभर फिरले, युवकांनाही जोडून घेतले. सातारच्या पावसात भिजले आणि राजकारणाचे पारडे पालटले. पुढच्या काळात महाविकास आघाडी आकाराला आली. एक बंडही त्यांनी मोडीत काढले. उतार वयातही आपल्या विरोधात जाण्याचे धाडस आमदार करणार नाहीत हे त्यांनी सिध्द करुन दाखवले. प्रकृती साथ देत नसतानाही, शरद पवार ही जिद्द आणतात कुठून? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. मात्र त्याचे उत्तर त्यांनी ‘लोक माझे सांगाती’ मध्ये देऊन ठेवले आहे. प्रकृती जेव्हा जेव्हा परीक्षा बघते, तेव्हा तेव्हा मी लोकांमध्ये जातो. तिथूनच मला ऊर्जा मिळते. त्यांना भेटणे हेच माझे औषध आहे, असे सांगणारे शरद पवार कर्करोग झाल्यानंतरही लोकांना भेटत राहिले. एरवी आजारात लोकांना भेटल्याने प्रतिकारक शक्ती कमी होते, असा अनुभव सांगणारे अनेक भेटतील. पण, या भेटीतून शक्ती वाढते असे सांगणारे पवार एकमेव! गेले तीन वर्षाहून अधिक काळ ते आपला आचारी सोबत घेऊन महाराष्ट्राचा प्रवास करतात. डॉक्टरांनी सांगितलेल्या पथ्याप्रमाणे त्यांचा आहार होतो. मात्र डायरीत लिहिलेल्या तारीख आणि वेळेत ज्या-त्या व्यक्तीला भेट आणि समारंभाला उपस्थिती चुकत नाही. दिल्लीत अचानक लागलेली एखादी बैठक किंवा अगदीच आगळी, वेगळी परिस्थिती असेल तरच पवारांचा दौरा रद्द होतो. अन्यथा ठरलेल्या वेळेत पवार हजर असतात. आठच दिवसांपूर्वी सांगली जिह्यातील आटपाडी येथे पाणी परिषदेच्या कार्यक्रमाला त्यांनी वेळ दिला होता. मात्र दिवाळीत भेटण्यास आलेल्या लोकांमुळे तासंतास उभे राहून शुभेच्छा स्वीकारल्याने थकवा आला. दौरा रद्द करावा लागतोय हे त्यांनी रात्रीच संयोजकांना कळवले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आपले दूत म्हणून त्या कार्यक्रमास वेळेत उपस्थित राहण्यास सुचवले. रात्रीत उत्तर महाराष्ट्राचा दौरा आटोपून जयंतरावांनी दुपारी आटपाडीतील पवारांचा कार्यक्रम पूर्ण केला. यशवंतराव चव्हाण यांच्या संपर्कात आलेले बहुतांश नेते दीर्घायुषी आणि असेच वेळेला, शब्दाला जागणारे आढळतात. लोक हीच त्यांची ऊर्जा असते. कोरोना काळात ज्ये÷ नेते एन.डी. पाटील आजारी पडले, ते लोकांची भेट होत नाही या कारणामुळे! पवार आपल्या दाजींची भेट घेण्यासाठी कोल्हापुरात आले. त्यांनी आपल्या बहिणीला आग्रह केला की, यांना लोकांना भेटल्याशिवाय बरे वाटणार नाही. सकाळी शिवाजी विद्यापीठ परिसर, संध्याकाळी शिवाजी पेठ अशा गर्दीच्या ठिकाणी गाडीतून फिरवा. यांना आपले लोक डोळय़ासमोर दिसले पाहिजेत. हेच त्यांचे औषध आहे. प्रसंगी वाळवा तालुक्मयात त्यांच्या गावाकडेही गाडी घेऊन जा! पवारांचा हा सल्ला लागू पडला आणि पुढे दीड वर्षे एन.डी.पाटील यांचे आयुष्य वाढले! राजकारणात आणि समाजकारणात असलेल्या व्यक्तींना आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील दुःखांना लोकांसमोर मांडून चालत नाही. त्यांना लोकांनाच धीर द्यावा लागत असतो. आपले दुःख आणि कष्ट हृदयात दडपून जबाबदारी पार पाडावी लागते. शरद पवार यांच्या खांद्यावर त्यांनी स्वतःहून घेतलेली जबाबदारी मोठी आहे. त्यांना होऊ न शकलेले पंतप्रधान किंवा साडेतीन जिह्याचे नेते असे हिणवणे सोपे आहे. अशा प्रकारची टीका करायला जीभ पुरेशी ठरते. पण एक शरद पवार निर्माण होण्यासाठी जी परिस्थिती निर्माण झालेली असते ती आगळीवेगळीच असते. त्यातूनच इतिहास बनतो. महाराष्ट्रातील सर्वच पक्षात असे काही हाताच्या बोटावर मोजण्याइतके नेते आहेत. अनेक लोकनेते बनणार आहेत. त्या सर्वांसाठीच शरद पवार यांची जिद्द आणि त्यांचे जीवन मार्गदर्शक ठरावे!
Previous Articleसाखर निर्यातीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी
Next Article कोव्हॅक्सिनचे 5 कोटी डोस वाया जाणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.