महाराष्ट्राचे राजकारण ज्या थराला चाललं आहे ते बघून धक्का बसला आहे. यांची नितीमत्ता कोठे चालली आहे असे म्हणून किरिट सोमय्या आता काय करणार असा प्रश्न शिवसेना- ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारांना घेऊन शिंदे- भाजप सरकारला पाठींबा देऊन सरकारमध्ये सामिल झाले. त्यावर संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
आपला एक व्हिडीओ जारी करून संजय पवार यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. व्हिडीओमध्ये बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्राचे राजकारण ज्या थराला चाललं आहे ते बघून धक्का बसला आहे. या लोकांची नितीमत्ता कोठे चालली आहे? किरीट सोमय्या आता काय करणार ? कारण ज्यांच्या घरी ईडी, सीबीआय यांच्या धाडी पडत आहेत त्यांनाच सोबत घेऊन आता बसत आहेत. ज्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून आम्हाला धोका देऊन गेले ते आता काय करणार ?” असा सवाल संजय पवार यांनी एकनाथ शिंदे गटाला केला. तसेच राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या लोकांनी लक्षात ठेवा की महाराष्ट्राची जनता सर्व काही बघत असून पुढील निवडणुकीत नीतिमत्ता पायदळी तुडवलेल्या नेत्यांना महाराष्ट्राची जनता त्यांची जागा दाखवून देईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.