मारोळी प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. तालुक्यामध्ये सक्रिय असणारे परिचारक गट भालके गट व विद्यमान आमदार अवताडे गट वेगवेगळ्या ग्रामपंचायत वरती दावा करत असताना मारोळी ग्रामपंचायतीवर भालके गटाचे बसवराज पाटील यांनी हॅट्रिक साधत तिसऱ्यांदा निर्विवाद वर्चस्व दाखवले. पाटील यांच्या पॅनलने एकहाती सत्ता मिळवत सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले आहेत. सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणण्याची किमया पाटील यांनी दुसऱ्यांदा केले आहे.
नुकत्याच झालेल्या व मंगळवेढा तालुक्यातील प्रतिष्ठित असणाऱ्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बसवराज पाटील यांनी बाजी मारली होती. तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंचपदाकरिता मोठे बंधू राजकुमार रामगोंडा पाटील यांना मैदानात उतरवले होते मारोळीतील जनतेने बसवराज पाटील यांच्या बाजूने कौल देत पुन्हा एकदा मारोळी ग्रामपंचायत बसवराज पाटील यांच्या हाती दिले आहे. मारोळी ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध होईल असे वाटत असताना बसवराज पाटील यांच्या विरोधात नवख्या तरुण उमेदवाराने दंड थोपटले होते. मात्र मारोळीच्या जनतेने नवख्या उमेदवाराला पसंती न देता पुन्हा एकदा बसवराज पाटील यांच्या हातात ग्रामपंचायत दिल्याने बसवराज पाटील यांनी हॅट्रिक साधले आहे.सरपंच पदाचे उमेदवार राजकुमार रामगोंडा पाटील यांनी तब्बल 556 मताधिक्याने सरपंच पदाची निवडणूक जिंकली आहे.