बेळगाव : एकीकडे ग्रामीण भागात दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असताना दुसरीकडे मात्र दिवसाही पथदिपांचा लखलखाट सुरू असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. गोकुळनगर-हिंडलगा येथे रविवारी दिवसभर पथदीप सुरू असल्याने ग्राम पंचायतीच्या दुर्लक्षामुळे विजेचा अपव्यय होत होता.
यामुळे काही नागरिकांनी संबंधित कर्मचाऱयाला कळवूनदेखील त्याच्याकडून दुर्लक्ष करण्यात आले. शहराला लागूनच असणाऱया हिंडलगा येथे पथदीप वेळच्या वेळी सुरू व बंद केले जात नसल्याची तक्रार नागरिकांमधून होत आहे. बऱयाच भागात रात्रीच्या वेळी पथदीप बंद असल्याची तक्रार नागरिकांनी ग्राम पंचायतीकडे वारंवार केली आहे. परंतु, ही व्यवस्था काही केल्या सुरळीत होताना दिसत नाही. दिवसा पथदीप सुरू तर रात्रीच्या वेळी बंद अशी स्थिती ग्रामीण भागात दिसत आहे. रविवारी दिवसभर पथदीप सुरू होते. हे पथदीप बंद करण्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता.