जमीन बळकाव प्रकरणातील संबंधितांना आदेश : न्या. व्ही. के. जाधव आयोगाने बजावल्या नोटिसा
पणजी : जमीन बळकाव प्रकरणी न्या. व्ही. के. जाधव चौकशी आयोगाने त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या 44 तक्रारीमधील (एफआयआर) तक्रारदार व आरोपी अशा दोघांनाही नोटीसा जारी केल्या असून चालू मार्च अखेरपर्यंत आपापले म्हणणे सादर करण्यास बजावले आहे. प्रकरणात जे कोणी सामील असतील आणि त्यांना जर काही माहिती, कागदपत्रे सादर करायची असतील, तर त्यांनी ती आयोगाकडे द्यावी असेही न्या. जाधव यांनी सूचित केले आहे.
सर्व तक्रारींची चौकशी सुरु
या प्रकरणात जर कोणी सरकारी, निमसरकारी कर्मचारी किंवा अधिकारी यांचा जर हात असेल तर तशी माहिती देण्यासही पुढे यावे, असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे. या सर्व तक्रारीची आयोग चौकशी करणार असून त्याला जबाबदार कोण आहेत, ते देखील आयोग आहे. या तक्रारींच्या प्रकरणात सरकारी कर्मचारी तसेच अधिकारी व इतरांचा कितपत हात आहे. याचा शोध आयोगातर्फे घेण्यात येणार आहे.
सर्वच कारणे शोधणार आयोग
याशिवाय सदर प्रकरणांतील त्रुटी, दुर्लक्ष, बेफिकिरी व इतर गोष्टींकडेही आयोग लक्ष पुरवणार आहे. प्रशासकीय यंत्रणा, कायदेशीर यंत्रणा यातून ही प्रकरणे कशी काय सुटतात आणि त्यांच्या ती लक्षात कशी येत नाहीत, याचेही उत्तर आयोग शोधणार आहे.
आयोग सरकारला करणार शिफारसी
अशी प्रकरणे पुन्हा घडू नयेत म्हणून काय उपाययोजना करावी याची शिफारस आयोग राज्य सरकारला करणार आहे. तसेच कारवाई कोणावर करावी याचेही निर्देश आयोग सरकारला देणार आहेत. प्रशासकीय यंत्रणा, कायदेशीर यंत्रणा यात काही बदल करण्याची गरज भासल्यास त्याची सूचनाही आयोग करणार आहे.
एसआयटीकडे प्रकरणे येणे सुरुच
दरम्यान, एसआयटीकडे (विशेष चौकशी पथक) जमीन बळकावण्याची प्रकरणे अजूनही येत असून त्यांची नोंदणी करण्यात येत आहे. आतापर्यंत एसआयटीकडे 200 पेक्षा अधिक जमीन बळकावल्याच्या तक्रारी आल्या असून त्यांची पडताळणी चालू आहे. प्रथमदर्शनी तक्रारीत तथ्य आढळून आल्यानंतर एसआयटीकडे तक्रारीची नोंद करण्यात येते आणि नंतर ती प्रकरणे न्या. जाधव चौकशी आयोगाकडे सोपवण्यात येतात.
एसआयटीकडून शंभर प्रकरणांची चौकशी
सध्या एसआयटीकडून 100 पेक्षा अधिक प्रकरणांची चौकशी चालू असून पुढील कार्यवाहीसाठी ती आयोगाकडे देण्यात येतात अशी माहिती सुत्रांनी दिली. आता जाधव चौकशी आयोग पुढे नेमके काय करणार आणि सरकार दोषीवर नेमकी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.