यात्रा-जत्रा, लग्नसराईला प्रारंभ : प्रवाशांच्या संख्येत वाढ, परिवहनची डोकेदुखी
बेळगाव : उन्हाळी सुटी, यात्रा-जत्रा, लग्नसराई आणि पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे बससेवेवर अतिरिक्त प्रवाशांचा ताण वाढला आहे. त्यामुळे परिवहनची डोकेदुखी वाढली आहे. आधीच परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता आहे. त्यामुळे वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे नियोजनाचा प्रश्न परिवहनसमोर आहे. उन्हाळी सुटी पडल्याने मूळगावी परतणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बससेवेवर ताण वाढू लागला आहे. त्याचबरोबर बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप गावच्या महालक्ष्मी यात्रेला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात धावणाऱ्या बससेवेवर ताण वाढला आहे. तसेच एप्रिल महिन्यात मुहूर्त अधिक असल्याने लग्नसराईची धामधूम सुरू झाली आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. याचा परिणाम बससेवेवर होऊ लागला आहे. विशेषत: शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जून महिन्यापासून बससेवेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यातच उन्हाळी हंगामात वाढणाऱ्या प्रवाशांसाठी बस नियोजनाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
उन्हाळी हंगामातील यात्रा-जत्रा, लग्नसराई आणि पर्यटनासाठी जादा बसेसची तडजोड करावी लागते. मात्र परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता आहे. शिवाय राज्य सरकारकडून मिळणाऱ्या नवीन बसेसही थांबल्या आहेत. त्यामुळे परिवहनच्या ताफ्यात असलेल्या बससेवेवरच डोलारा चालवावा लागणार आहे. उन्हाळी हंगामात यात्रा-जत्रा, लग्नसराई आणि पर्यटनासाठी बसेसना अधिक मागणी असते. काही बसेस लग्नसराईसाठी बुकिंगही केल्या जातात. त्यामुळे इतर मार्गावर बसेसची कमतरता जाणवते. 11 जूनपासून शक्ती योजनेला प्रारंभ झाला आहे. याअंतर्गत महिलांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात शक्ती योजना आणि वाढती प्रवाशांची संख्या परिवहनसाठी डोकेदुखी ठरणार आहे.