ग्रामीण भागातील परंपरागत पद्धतीच्या व सातत्यपूर्णरित्या काम करणाऱ्या कुटीरोद्योग क्षेत्रातील लघुउद्योग व उद्योजकांसाठी आर्थिक साहाय्यासह मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारी अशी ‘स्फूर्ती’ योजना आहे. ‘स्कीम ऑफ फंड फॉर रिजनरेशन ऑफ ट्रेडिशनल इंडस्ट्रीज’ असे सार्थ नामाभिधान असणाऱ्या स्फूर्तीचे अनेकविध फायदे ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रामोद्योगी मंडळींना कसे होऊ शकतात त्याचाच हा आढावा…
‘स्फूर्ती’ योजनेची पार्श्वभूमी म्हणजे ग्रामीण भागातील कृषी व तत्सम क्षेत्रावर आधारित स्वयंरोजगार वा कुटीरोद्योग करणाऱ्या उद्योगी कारागिरांना सामूहिक स्वरुपात मार्गदर्शनासह आर्थिक मदत करणे. यामध्ये प्रामुख्याने हातमाग, ग्रामीण कलाकुसर, खादी व संबंधित उत्पादन, नारळावर आधारित वस्तू, बांबूशी निगडीत उत्पादने, लाकडी खेळणी, मध संकलन, कृषी उत्पादनावर आधारित फळ प्रक्रिया या आणि यासारख्या उद्योगांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण उद्योग क्षेत्रावर आधारित या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 2005-2006 मध्ये केली व ‘स्फूर्ती’चे नव्याने पुनरुज्जीवन 2014 मध्ये व्यापक स्वरुपात करण्यात आले हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. योजनेचा मुख्य उद्देश परंपरागत कुटीरोद्योग करणाऱ्या ग्रामोद्योगींना त्यांच्या व्यवसायाला मदत स्वरुपात आर्थिक मदतीद्वारे पाठबळ उपलब्ध करून देणे आहे. यामागे विशेषत: ग्रामीण भागात कारागीर-लघुउद्योजकांना त्यांच्या कौशल्य व कारागिरीवर आधारित सामूहिक स्वरुपात उद्योजकता विकसित करण्यासाठी मदत करणे हा आहे. स्वयंरोजगारातून कृषीवर आधारित ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी व्यावसायिक एकक स्वरुपात काम करण्यावर भर दिला जातो. योजनेमध्ये ग्रामीण उद्योजकांच्या उत्पादन-प्रक्रियेपासून विक्री क्यवसायापर्यंतच्या टप्प्यांचा समावेश करण्यात आला आहे. ‘स्फूर्ती’ अंतर्गत ग्रामीण भागातील नियमित लघुउद्योगांच्या एककांना अर्थसाहाय्य करण्यात येते. प्रचलित नियमांनुसार 500 पर्यंत ग्रामीण कारागीर-लघुउद्योजकांच्या एकक म्हणजेच क्लस्टरसाठी अडीच कोटीपर्यंत तर 500 हून अधिक लघुउद्योजक-ग्रामोद्योगींच्या एककाला पाच कोटीपर्यंतचे अर्थसाहाय्य दिले जाते. या अर्थसाहाय्याचा उपयोग कृषी क्षेत्रातील व ग्रामीण उद्योजकतेवर आधारित लघुउद्योजकांना घेता येतो. वरील आर्थिक मदतीशिवाय ‘स्फूर्ती’ अंतर्गत ग्रामीण व कुटीरोद्योग क्षेत्रात वेगवेगळ्या स्वरुपात मार्गदर्शनपर मदत केली जाते. यामध्ये थेट व प्रत्यक्ष मदत म्हणून ग्रामोद्योगी एककासाठी गरजेनुरुप सार्वजनिक उत्पादन-प्रक्रिया केंद्र अथवा सर्व लघुउद्योजकांना उपयुक्त ठरेल असे सुविधा केंद्र स्थापन करता येते. या स्वरुपाच्या सार्वजनिक स्वरुपाच्या केंद्रांमध्ये लघुउद्योजक एककाच्या गरजेनुरुप आवश्यक अशी उपकरणे व मशिनरी, डिझाईन केंद्र, सामूहिक स्वरुपातील कच्चा मालाची खरेदी इ. चा समावेश होऊ शकतो. सामूहिक उद्योग-प्रक्रिया केंद्रांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते प्रशिक्षण देणे, प्रत्यक्ष कामाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणे, मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, संबंधित कार्यरत एकक केंद्राला भेटी देणे यासाठी मदत राशी मिळते. याशिवाय ग्रामोद्योगी एकक प्रस्थापित झाल्यावर त्यांना विक्री-व्यवसाय, ई-मार्केटिंग, व्यावसायिक पद्धतीने प्रचार-प्रसार, प्रगत संशोधन व विविध व्यावसायिक उपक्रमांसाठी अर्थसाहाय्य ‘स्फूर्ती’ देते. ग्रामीण लघुउद्योग क्षेत्रातील उद्योगांसाठी असणाऱ्या ‘स्फूर्ती’ योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रामीण कारागीर अथवा लघुउद्योजक विशिष्ट एकक स्वरुपात कार्यरत असावेत. याशिवाय ग्रामोद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या प्रस्थापित समाजसेवी संस्था, राज्य वा केंद्र शासनाच्या या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, पंचायत राजविषयक काम करणाऱ्या संस्था पण ‘स्फूर्ती’ योजनेअंतर्गत समाविष्ट केल्या जाऊ शकतात. ‘स्फूर्ती’ याजनेंतर्गत समाविष्ट एककांच्या प्रकल्पपूर्तीचा कालावधी 12 ते 18 महिने असतो. या दरम्यान योजनेत समाविष्ट कारागीर चार हप्त्यामध्ये त्यांचे शुल्क भरू शकतात. सुरुवातीच्या अंमलबजावणी काळानंतर समाविष्ट ग्रामोद्योगींना त्यांचा व्यवसाय-उद्योग व कारागिरी-कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी अंमलबजावणी संस्था, विषयतज्ञ, मार्गदर्शन, लघुउद्योग विकास संस्था यासारख्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येते. सरकारी स्तरावर ग्रामीण उद्योजकांना आर्थिक मदतीशिवाय तांत्रिक मार्गदर्शन, गरजेनुऊप संगणकीय अद्ययावत पद्धती, उत्पादन व प्रशासनिक प्रक्रियांचे सुलभीकरण, सतत सुधारणा पद्धतीवर भर व त्यासाठी प्रोत्साहन, प्रगत प्रक्रिया पद्धतीचा अवलंब, सहभागी सदस्य कारागिरांना आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. परंपरागत कारागिरी व कौशल्य यांची व्यावसायिक सांगड घालून त्यांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ व वाढते उत्पन्न मिळावे यासाठी आवश्यकतेनुऊप प्रयत्न केले जातात. यामध्ये स्थानिक स्तरावरील विविध कलात्मक पद्धतींवर आधारित वस्तूंच्या विक्रीसाठी आदिवासी विकास मंत्रालय, पर्यटन विकास मंडळ इ. चा वापर केला जातो. कृषी उत्पादन, फलोत्पादन व प्रक्रिया यावर आधारित ग्रामीण लघु उद्योजकांना त्यांच्या संबंधित पदार्थामध्ये गुण, दर्जा, चव व त्यांची उपयुक्तता यामध्ये वाढ करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. यामध्ये अशा उत्पादनाचे पॅकिंग, साठवणूक, वाहतूक व विक्री यासाठी सामूहिक प्रयत्नांना चालना दिली जाते. विशेषत: अन्न प्रक्रिया क्षेत्राशी निगडित उत्पादनांचा दर्जा सुधारून संबंधित ग्रामोद्योगीला अधिक फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. याचा लाभ बहुसंख्य कृषी उद्योजकांना होऊ शकतो. ग्रामीण उद्योग एककांना परस्पर संपर्क-सहकार्य व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी संपर्क व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते. याकामी ई-कॉमर्स प्रणालीचा उपयोग केला जातो. सामूहिक वाहतूक व्यवस्था पद्धतीचा अवलंब करण्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यवसाय उपलब्ध होऊ शकतो. त्याद्वारे वाढत्या विक्री व्यवस्थेचा लाभ मिळू शकतो. कृषी उद्योगांना गरजेनुरुप व वेळेत तंत्रज्ञानासह मदत व मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी एकक स्तरावर संबंधित अंमलबजावणी विभाग वा यंत्रणेद्वारे अभियांत्रिकी, कृषी विकास, अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या शैक्षणिक संशोधन संस्थांचे सहकार्य उपलब्ध करून दिले जाते. याशिवाय ग्रामीण उद्योगांच्या प्रत्येक एककामध्ये सौर ऊर्जेला प्राधान्य, पर्यावरण संरक्षणावर भर, स्थानिक कौशल्यांसह कच्च्या मालाचा वापर याला प्रोत्साहन दिले जात असल्याने कृषी व ग्रामीण उद्योग तसेच लघु उद्योजकांना पाठबळ उपलब्ध झाले आहे. आकडेवारीसह सांगायचे म्हणजे 2015-16 मध्ये ग्रामीण व कृषी उद्योगांच्या एककांची जेमतेम सुरुवात झाली होती. गेल्या सुमारे 6 वर्षांत यशस्वी व कार्यरत ग्रामीण उद्योग एककांची संख्या 100 वर झाली आहे. याशिवाय आणखी 400 लघु उद्योग एककांना शासकीय मंजुरी मिळाली असून त्यांची पुढील प्रशासनिक प्रक्रिया सुरू आहे.परंपरागत स्वरुपाच्या प्रमुख यशस्वी ग्रामीण उद्योग एककांमध्ये जम्मू-काश्मीरचा गालीचा उद्योग, मेघालयातील बांबू कलाकारी, कर्नाटकातील खेळणी, राजस्थानमधील जंगली व नैसर्गिक रंग, बिहारची मधुबनी चित्रकारी, कोल्हापूरचे आकर्षक साज, केरळचे दोर उत्पादन, उत्तरप्रदेशातील पायपोस, ओडिशाचे भरड धान्य उत्पादन, अरुणाचलची खादी सिल्क इ. चा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. ग्रामीण भागातील व कृषीवर आधारित उद्योग आणि परंपरागत लघुउद्योजकांच्या यशस्वी, उद्योजकतेचा उत्साहवर्धक परिचय आता ‘स्फूर्ती’ च्या माध्यमातून सर्वांनाच होत आहे.
दत्तात्रय आंबुलकर