पुणे: राज्यसभेच्या सहाव्या जाग्यावरून संभाजीराजे छत्रपती यांची कोंडी सुटता सुटत नसताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आणखी एक भूमिका जाहीर करून संभाजीराजे यांच्या कोंडीचा विळखा आणखी घट्ट केला आहे. पुण्यात झालेल्या ब्राम्हण समाजाच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी, आमच्या पक्षापुरता निर्णय सांगतो. एक जागा निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी मत आमच्याकडे आहेत. दोन वर्षापूर्वी निवडणुका झाल्या त्यावेळी आम्हाला एक जागा मिळत होती. त्यावेळी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुसरी जागा मागितली होती. ती त्यांनी मान्य केली होती. माझी आणि फौजिया खान अशी ती निवडणूक होती. त्यामुळं आता आमची उरणारी मतं शिवसेनेचा जो उमेदवार असेल, त्यांना असेल. मग त्या ठिकाणी संभाजीराजे असो किंवा आणखी कोण असो, त्याला द्यावी लागतील,असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार पुढे म्हणाले, आमच्या पक्षातील एक-दोन नेत्यांनी चुकीचे वक्तव्य केले होते. त्यावर माझा आक्षेप होता. त्यांना आमच्या सहकाऱ्यांना जात धर्माविरोधात वक्तव्य करु नये, असं सांगितलं आहे. केंद्र आणि राज्याची आकडेवारी आम्ही गोळा केली होती. सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये त्यांचं प्रमाण अधिक असल्यानं त्यांची आरक्षणाची मागणी मान्य करता येणार नाही,असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आरक्षण कुणालाच नको, अशी भूमिका घेतली होती. मात्र, मी त्यांना असं करता येणार नाही, असं सांगितलं. या देशातील दलित, आदिवासी यांना आरक्षण द्यावं लागेल. हा वर्ग मागं राहिलेला आहे, तो इतरांच्या बरोबरीला येईपर्यंत आरक्षणाला विरोध करु नये असं मी त्यांना सांगितलं आहे. असे पवार म्हणाले