वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणावर केवळ भारतच नव्हे तर अफगाणिस्तानच्या तालिबान राजवटीनेही संताप व्यक्त केला आहे. अफगाणिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित स्वर्ग बनत आहे, असे विधान शरीफ यांनी त्यांच्या भाषणात केले होते. शरीफ यांचे हे वक्तव्य अनाठायी आणि धादांत खोटे आहे, अशी प्रतिक्रिया तालिबान राजवटीच्या प्रवक्त्याने व्यक्त केली.
अफगाणिस्तान जगाच्या शांततेला सर्वात मोठा धोका आहे, असेही उद्गार शरीफ यांनी काढले होते. याबद्दल पाकिस्तानने आमची आणि जगाची क्षमायाचना करावी, असे तालिबानने म्हटले आहे. जगाने तालिबानला एकटे पाडू नये. तालिबान अफगाणिस्तानची प्रगती करण्याचा प्रयत्न करीत असून त्या कामी सहकार्य करावे, असे आवाहन तालिबान राजवटीने केले आहे.