शाळेचा पहिला दिवस उत्साहात
सांखळी /सुरेश बायेकर
राज्यातील शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अचानक उसगाव तिस्क पिळये येथील सरकारी प्राथमिक शाळेला व त्यानंतर भामई-पाळी येथील ताराबाई दळवी विद्यालयांना आकस्मिक भेटी देऊन विद्यार्थी तसेच शिक्षकवर्गालादेखील सुखद धक्का दिला. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेमध्ये जाऊन मुलांमदये विश्वास निर्माण करणारे डॉ. प्रमोद सावंत हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
राज्यात शैक्षणिक वर्षाला आज सोमवार दि. 6 जून रोजी सुरवात झाली. शाळेचा पहिला दिवस असल्याने मुलांच्या चेहऱयावर प्रसन्नता दिसून येत होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भामई येथील ताराबाई दळवी विद्यालयाला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भविष्यात कधीही न घाबरता पुढें पुढे जा खूप अभ्यास करा, आपण सुसंस्कृत झालो पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षाच्या शाळेच्या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आजपासून शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्य़ांची बरीच धावपळ दिसून आली. शाळेच्या वेळेत पोहचण्यासाठी मिळेल त्या वाहनाने मुले जात होती. काही ठिकाणी मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांच्या वाहनांची रस्त्यावर गर्दी दिसून आली.
मुलांना शाळेत वेळेत पोहचता यावे यासाठी वाहतूक पोलिसांना देखील बरीच कसरत करावी लागली. मुलांना शाळेत सोडण्यासाठी शाळा परिसरात पालकांच्या वाहनांची झालेली गर्दी, त्याचवेळी मार्गावरून जाणारी अवजड वाहने यामुळे होणारी वाहतूक कोंडी यातून मुलांना वेळेत शाळेत सोडण्यासाठी वाहतूक पोलीस कसरत करत असल्याचे दिसून आले.
दोन वर्षानंतर शाळा पुन्हा उघडल्यामुळे सर्वत्र प्रसन्न वातावरण सोमवारी पाहायाला मिळाले. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी व पालक खुश दिसतं होते. मुले शाळेत जायला तयार होतील की नाही अशी शंका काही पालकांनी व्यक्त केली होती. ऑनलाईन शिक्षण काळात मोबाईल वापराची सवय झाली. आता ऑफ लाईन शिक्षण घेताना शिक्षकांचा ससेमिरा लागणार असल्याने गडय़ा आपला कोरोनाच बरा असे काही विद्यार्थी बोलताना दिसत होते. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे असे ही काही विद्यार्थी बोलत होते.
वीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागातून शाळेला जाणे म्हणजे एक वेगळीच मजा होती. हातात एक नोंद वही, शर्ट च्या खिशात एक पेन, कालसावच्या खिशात चिल्लर पैसे, वाटेत लागणार धोधो पाऊस, ओलेचिंब भिजलेला तो शाळेचा गणवेश, वाटेत वाहणाऱया पावसाच्या पाण्यावर कागदी होडय़ा सोडणे अशी खूपच मज्जा असायची मात्र आजच्या काळात हे सगळे बदललेल आम्हाला पाहायला मिळते. आज घरच्या दारातून शाळेच्या दारात इतकं सोपं झालं आहे शाळेच्या पहिल्या दिवशी पाऊस येईल का असा प्रश्न मुलांना पडला होता. मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी पाऊस आलाच नाही.
सांखळी मतदारसंघातील पाळी श्री नवदुर्गा, वेळगे श्रीमती हायस्कूल, सिद्धार्थ बांदोडकर उच्च माध्यमिक विद्यालय, भामई ताराबाई दळवी हायस्कूल, सुर्ल सरकारी माध्यमिक विद्यालय, कोठंबी टागोर विद्यालय, कुडणे महालक्ष्मी हायस्कूल, न्हावेली सरकारी माध्यमिक विद्यालय, विविध उच्च माध्यमिक विद्यालय, आमोणे सरकारी विद्यालय, हरवळे श्री गणेश विद्यालय, आणि सांखळी शहरातील सरकारी आणि खाजगी विद्यालयात आणि मतदारसंघात सर्व सरकारी प्राथमिक शाळात शाळेचा पहिला दिवस उत्सहात साजरा करण्यात आला.