रहिवाशांना करावी लागतेय कसरत
बेळगाव : शहरातील विविध भागात विकासकामे राबविण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र कचेरी गल्ली, शहापूर येथील सुरू केलेले काम बऱ्याच दिवसांपासून थांबले आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या गणेश मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे. रहिवाशांनादेखील गटार पार करताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मनपाच्या या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कचेरी गल्ली परिसरातील गटार खराब झाल्याने नव्याने बांधण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. बांधकामासाठी चर खोदून बेडकाँक्रिट घालण्यात आले. पण पुढील काम पूर्णपणे रखडले आहे. काम पूर्ण करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. कामाची सुरुवात केल्यानंतर कंत्राटदार गायब झाल्याने हे काम कधी पूर्ण होणार, असा मुद्दा परिसरातील रहिवासी उपस्थित करीत आहेत. गटार बांधकामासाठी चर खोदण्यात आल्याने रहिवाशांना ये-जा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. काही ठिकाणी साकव आणि फळ्या घालून नागरिक ये-जा करीत आहेत. पण मातीचे ढिगारे आणि चरीवरून ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. परिसरात गणेश मंदिर असल्याने तेथे जाणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. गटारीच्या खोदाईमुळे मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यास अडचण होत आहे. महापालिकेच्या अर्धवट कामाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.