अध्याय पंचविसावा
ईश्वराची भेट घेणे हे मनुष्य जन्माचे सार्थक होण्याच्या दृष्टीने करण्याचे मुख्य काम होय पण ईश्वर तर त्रिगुणांच्या पलीकडे असतो आणि मनुष्य तर त्रिगुणातच गुंग असतो. म्हणून जर ईश्वराला भेटायचं असेल तर त्रिगुणांचा पडदा दूर करता यायला हवा. ह्या त्रिगुणांच्या पडद्याला अहंकाराचा पडदा असेही म्हणता येईल. म्हणजेच माणसाच्या स्वभावातला अहंकार दूर झाला की, ईश्वरभेट निश्चित होते. त्यादृष्टीने गुणांच्या वैशिष्ठय़ांची माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे.
म्हणून भगवंत उद्धवाला त्रिगुणांची वैशि÷dय़े सांगत आहेत. सत्त्वगुणाबद्दल सांगताना भगवंत म्हणाले, मनाचा संयम, इंद्रियनिग्रह, सहिष्णूता, विवेक, तप, सत्य, दया, स्मृती, संतोष, त्याग, विषयांच्या उपभोगांबद्दल अनिच्छा, श्रद्धा, लज्जा, आत्मरती, दान, विनय, सरलता इत्यादी सत्त्वगुणाच्या वृत्ती होत. या पंधरा लक्षणांची स्थिती ज्याच्या ठिकाणी असते, तोच शुद्ध सत्त्वाची मूर्ती होय. याबद्दल सविस्तर सांगून झाल्यावर रजोगुणाची लक्षणे सांगताना ते म्हणाले, इच्छा, प्रयत्न, गर्व, लोभ, ताण, अपेक्षा, भेदबुद्धी, विषययोग, युद्ध इत्यादीसाठी गर्वयुक्त उत्साह, आपल्या यशावर प्रेम, कुत्सती हास्य, पराक्रम, हट्टाने उद्योग करणे इत्यादी रजोगुणाच्या वृत्ती होत. सत्त्व आणि रजोगुणांबद्दल सांगून झाल्यावर आता ते तमोगुणाचे सविस्तर वर्णन करत आहेत. ते म्हणाले, तमोगुणी माणूस म्हणजे अविचाराची खाण असते. आपल्या अविचारी कृतीने आपण आपलेच नुकसान करून घेत आहोत हेही त्याच्या लक्षात येत नाही.
क्रोध, लोभ, मिथ्या भाषण, हिंसा, याचना, पाखंड, श्रम, भांडण, शोक, मोह, विषाद, दीनता, निद्रा, आशा, भय, आळस ही तमोगुणाची वैशिष्टय़े होत. आता त्याबद्दल सविस्तर सांगतो. क्रोध म्हणजे कामाची परिपूर्ण वाढ झालेली अवस्था. लोभ म्हणजे अत्यंत कृपणपणा. अनृत म्हणजे खोटे भाषण. हिंसा म्हणजे दुसऱयाला पीडा देणे. याच्चा म्हणजे हांजी हांजी करणे. दंभ म्हणजे असामान्यता मिळविण्यासाठी केलेले ढोंग, क्लम म्हणजे अत्यंत परिश्रमांनी आलेला थकवा आणि विनाकारण तंटा बखेडा करणे याचे नाव कलि. शोक म्हणजे हाहाःकार, मोह म्हणजे भ्रमाचा पूर, विषाद म्हणजे जेणेकरून अंतःकरणाला चटका बसेल असा दुःखाचा संचार, आर्ती म्हणजे अत्यंत संताप, निंदा म्हणजे खोटे आरोप करणे, आशा म्हणजे अतिशय लोभिष्टपण, भी म्हणजे भयाने अंगाचा अत्यंत थरकाप होणे. आता निदेतील वर्म ऐक. जे आळसाचे माहेरघर आणि जी अत्यंत मोठी सुस्ती, तीच अमर्याद तामसी निद्रा होय.
सर्व उद्योग सोडून अत्यंत सुस्तीमध्येच तम सुखाने राहाते. या तमोगुणाच्या सोळा कळा आहेत. त्या ज्याच्या अंगांत बाणलेल्या असतात, तोच तमोगुणरूप रात्रीतला अमावास्येचा चंद्र होय. तामसी मनुष्य अविचाराने आंधळा झालेला असल्याने तो असून नसून सारखाच असतो म्हणून त्याला अमावस्येचा चंद्र असं म्हंटलं आहे. सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांची ओळख होण्यासाठी त्यांचे निरनिराळे वर्णन केले. आता त्यांचे जे मिश्र लक्षण ते ऐक. तीन गुणांची स्थिती तुला सांगितली. त्या एकाएकाच्या अनंत वृत्ती आहेत. त्याही अनंत प्रकारच्या होतात. त्यामुळेच येथे जीवाला गुणाच्या गुंत्यांत पडावे लागते.
स्त्रियांच्या मस्तकावर केस एकमेकांत मिसळून गेलेले असले, तर ते काही जिचे तिलाच सोडवावयाला येत नाहीत. त्याप्रमाणेच ही त्रिगुणांची गुंतागुंतही जीवाच्या हाताने सुटत नाही. मैत्रिणी, आई, बहिणी, या एकत्र जमून हातात तेल व फणी घेऊन त्या चिकटून गुंतलेल्या केसांची गुंतागुंत सोडवितात, त्याप्रमाणेच जीवाला ही त्रिगुणांची वेणी आहे. त्रिगुणांचे विभाग जीवाच्याच सामर्थ्याने जर झाले असते, तर तो जीव शुद्ध सत्त्वात राहून नंतर गुणातीत अवस्थेत शिरला असता पण असा हा आपल्याच गुणांचा उलगडा जीवाला करता येणे शक्मय नाही. म्हणूनच, जे भाग्यवान् आहेत ते गुरुचरणांवरच एकनि÷ भाव ठेवितात. जे जगामध्ये भाग्याने भाग्यवान झालेले असतात, ज्यांना सद्गुरु हीच सख्खी आई असते, ते सद्गुरु सख्ख्या आईच्या मायेने विवेक वैराग्याची फणी घेऊन त्यांची त्रिगुणांची वेणी सोडवितात.
क्रमश