वृत्तसंस्था/ मुंबई
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथे दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होणार आहे. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाला बाद फेरीतील आपले स्थान निश्चित करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावाच लागेल. दिल्ली संघासाठी हा सामना म्हणजे उपांत्यपूर्व सामन्यासारखाच असेल. मुंबई संघाकडून आयपीएल स्पर्धेतील त्यांच्या शेवटच्या सामन्यात कदाचित सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला अंतिम अकरा खेळाडूंत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत पाचवेळा आयपीएल चषकावर नाव कोरणाऱया मुंबई इंडियन्स संघाचा प्राथमिक फेरीतील हा शेवटचा औपचारिक सामना आहे. 2022 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन बलाढय़ संघांना आपले आव्हान जिवंत ठेवता आले नाही. स्पर्धेच्या गुणतक्त्यात हे दोन्ही संघ शेवटच्या दोन स्थानावर राहिले आहेत. मुंबई इंडियन्सच्या या शेवटच्या औपचारिक सामन्यात अर्जुनला पहिल्यांदाच मैदानात उतरण्याची संधी मिळण्याची अपेक्षा आहे. आयपीएलच्या दोन हंगामामध्ये सलग 27 सामन्यात अर्जुन तेंडुलकरला केवळ बेंचवर बसावे लागले होते. या शेवटच्या सामन्यामध्ये काही नवोदितांना संधी दिली जाईल, असे संकेत कर्णधार रोहित शर्माने यापूर्वीच दिले आहेत. मुंबई इंडियन्सकडून यावेळी 13 सामन्यात 22 जणांना खेळण्याची संधी मिळाली आहे.
पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने या स्पर्धेत 13 सामन्यांत +0.255 धाव सरासरी राखत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाला मागे टाकले आहे. बेंगळूर संघाने या स्पर्धेत -0.253 धाव सरासरी राखली आहे. त्यामुळे दिल्ली संघाला सोमवारच्या सामन्यात प्लेऑफमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी केवळ विजय जरूरीचा आहे. कारण दिल्लीने नेट रनरेटमध्ये बेंगळूरला मागे टाकले आहे. दिल्ली संघाने या स्पर्धेत सात सामने जिंकले असून सहा सामने गमविले आहेत. त्यांनी आपल्या यापूर्वीच्या सामन्यात पाठोपाठ विजय मिळवीत पूर्ण गुण वसूल केले आहेत. दिल्ली संघातील फलंदाज डेव्हिड वॉर्नरने 427, मिचेल मार्शने 251, पॉवेलने 207 धावा जमविल्या असून त्यांच्या कामगिरीत सातत्य दिसत आहे तर कुलदीप पवार, अक्षर पटेल, ललित यादव, नॉर्त्जे, शार्दुल ठाकुर हे दिल्ली संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. कुलदीप यादवने 20, अक्षर पटेलने 6, ललित यादवने 4 तर खलील अहमदने 16 व शार्दुल ठाकुरने 13 गडी बाद केले आहेत. कर्णधार पंतने या स्पर्धेत आतापर्यंत 301 धावा जमविल्या असल्या तरी गेल्या काही सामन्यात तो धावा जमविण्यासाठी झगडत आहे. दिल्ली संघातील गोलंदाज मुस्तफिजुर रेहमानने 8 गडी बाद केले आहेत. सोमवारच्या सामन्यात वॉर्नरसमवेत सर्फराज खानला सलामीला पाठविण्याची शक्यता आहे. पृथ्वी शॉची उणीव दिल्ली संघाला निश्चित भासत आहे.
संभाव्य संघ ः मुंबई इंडियन्स– रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रित सिंग, राहुल बुद्धि, रमणदीप सिंग, सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, थंपी, शोकेन, बुमराह, उनादकट, मार्कंडेय, एम. अश्विन, मेर्डीथ, मिल्स,कार्तिकेय सिंग, सॅम्स, बेवीस, ऍलेन पोलार्ड, संजय यादव, ज्युयेल, इशान किसन.
दिल्ली कॅपिटल्स-रिषभ पंत (कर्णधार), हेब्बार, वॉर्नर, मनदीप सिंग, पॉवेल, नॉर्त्जे, साकारिया, खलील अहमद, कुलदीप यादव, एन्गिडी, मुस्तफिजुर रेहमान, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, नागरकोटी, ललित यादव, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपाल पटेल,. सर्फराज खान, ओसवाल, यश धुल, भरत आणि सिफर्ट.