अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे वक्तव्य ः
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षात भारताच्या विकासदरावरून वेगवेगळय़ा संस्थांकडून वेगवेपे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. आता केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात 7.4 टक्क्यांनी वाढणार असल्याचा दावा केला आहे. याचबरोबर पुढील आर्थिक वर्षातही भारताचा विकासदर इतकाच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जागतिक स्तरावर अद्याप स्थिती आव्हानात्मक आहे. याचमुळे आता निष्काळजीपणाने कुठलेच पाऊल उचलता येणार नाही. निष्काळजीपणा घातक ठरू शकतो. जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग मंदावल्याने सर्वाधिक प्रभाव देशाच्या निर्यात क्षेत्रावर पडला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात वेगाने विकास करणार आहे. आम्ही निश्चितपणे 7.4 टक्के विकासदर गाठणार आहोत. याचबरोबर हाच दर पुढील आर्थिक वर्षातही कायम राहणार असल्याचे सीतारामन यांनी नमूद केले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तसेच जागतिक बँकेने देखील पुढील दोन आर्थिक वर्षांमध्ये भारताचा विकासदर सर्वात अधिक राहणार असल्याचा अनुमान व्यक्त केला आहे. या दोन्ही जागतिक संस्थांचा अनुमान भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अनुमानाशी जुळणारा असल्याचे त्या म्हणाल्या.
जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग मंदावल्याने निर्यात क्षेत्राला अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. प्रतिकूल स्थितीवर मात करण्यासाठी सरकार या संस्थांसोबत मिळून काम करणार आहे. निवडणुकीपूर्वी आश्वासने देणाऱया राजकीय पक्षांनी खर्चांचा विचार लक्षात घेत अर्थसंकल्पीय तरतूद करायला हवी, स्वतःच्या आश्वासनांचा भार अन्य संस्थांवर टाकू नये असे अर्थमंत्र्यांनी मोफत योजनांचा उल्लेख करत म्हटले आहे.