पुढील सुनावणी 27 ऑक्टोबर रोजी
प्रतिनिधी /बेळगाव
मणगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाचा अवमान झाला होता. त्यानंतर महाराष्ट्रामध्येही त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. महाराष्ट्रातील सांगली येथून दिनेश कदम हे मणगुत्ती परिसरात दाखल झाले होते. त्यांनी यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाचा अवमान झाला तर त्यांना जशाच तसे उत्तर देऊ, असे सुनावले होते. त्या प्रकरणी कदम यांच्यावर यमकनमर्डी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी संकेश्वर येथील जेएमएफसी न्यायालयात सुरू झाली आहे.
यमकनमर्डी पोलिसांनी त्यांच्यावर कलम 505 (2) अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दोषारोप दाखल केला. सोमवारी सुनावणी असल्यामुळे कदम हे न्यायालयात हजर झाले. या खटल्याची पुढील सुनावणी आता 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
त्यांच्यावतीने ऍड. महेश बिर्जे, ऍड. रिचमॅन रिकी हे काम पाहत आहेत. सुनावणीवेळी युवा म. ए. समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, शिवाजी मंडोळकर देखील उपस्थित होते.