पुणे / प्रतिनिधी :
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या न्यून दाबाच्या क्षेत्राचे मंगळवारी रात्री उशिरा पूर्वमध्य अरबी समुद्रात वादळात रुपांतर झाले. या वादळाचे नाव ‘बिपरजॉय’ असे ठेवण्यात आले असून, हे वादळ त्याच्या उत्तरेला प्रवास करणार असून, पश्चिम किनारपट्टीला त्याचा फारसा धोका नसल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्याचे मंगळवारी न्यून दाबाच्या क्षेत्रात व त्यानंतर वादळात रुपांतर झाले. अरबी समुद्रातील यंदाच्या हंगामातील हे पहिले वादळ आहे. या वादळाचे ‘बिपरजॉय’ असे नामकरण करण्यात आले असून, हे नाव बांग्लादेशने दिले आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता न्यून दाबाचे क्षेत्र गोव्याच्या दक्षिण-दक्षिणपश्चिमेला 930 किमी, मुंबईपासून 1060, पोरबंदरपासून 1450, तर कराचीपासून दक्षिणेला 1450 किमी अंतरावर होते. ताशी 6 किमी वेगाने हे क्षेत्र प्रवास करीत आहे. मंगळवारी रात्री उशिरा याचे वादळात रुपांतर झाले.
वादळाची तीव्रता वाढणार
दरम्यान, मंगळवारी उशिरापर्यंत न्यून दाबाचे वादळात रुपांतर होणार आहे. उत्तरेच्या दिशेने प्रवास करीत 11 जूनपर्यंत या वादळाचे अतितीव्र वादळात रुपांतर होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
पश्चिम किनारपट्टीवर परिणाम
वादळाच्या प्रभावामुळे पश्चिम किनारपट्टीवर मोठा परिणाम होणार आहे. 6 जूनपासूनच पूर्वमध्य, पश्चिमध्य व मध्य अरबी समुद्र खवळलेला राहणार असून, या भागात ताशी 60 ते 70 किमी वेगाने वारे वाहणार आहे. याबरोबरच लक्षद्वीप, मालदीव, केरळ कर्नाटक किनारपट्टीवर 60 किमी वेगाने वाहणार आहे. यात उत्तरोत्तर वाढ होणार आहे.
कोकण गोवा, कर्नाटकवर परिणाम
या वादळामुळे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार आहेत. या भागातील समुद्रही खवळलेला राहणार आहे. 6 जूनपासूनच याचे परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली आहे. 8 ते 10 जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहणार असून, किनारपट्टीला अलर्ट देण्यात आला आहे. मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याची सूचना करण्यात आली आहे. याबरोबरच महाराष्ट्र, गोव्यासह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा ‘यलो अलर्ट’ही देण्यात आला आहे.
वादळ ओमानच्या दिशेने, पश्चिम किनारपट्टीला धोका नाही
भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, हे वादळ उत्तरेच्या दिशेने प्रवास करणार असून, ओमानच्या किनारपट्टीकडे जाणार आहे. त्यामुळे भारतीय किनारपट्टीला याचा फारसा धोका नाही. 11 जूनपर्यंत टप्प्याटप्याने वादळाची तीव्रता वाढत जाऊन ते उत्तरेच्या दिशेने सरकत जाणार आहे.
वादळामुळे मान्सून खोळंबला
दरम्यान, मान्सूनने लक्षद्वीप, कॉमेरुन बेटे, मालदीवपर्यंतचा भाग व्यापला आहे. मात्र वादळामुळे हवेतील बाष्प खेचले जात असून, याचा फटका मान्सूनच्या वाटचालीवर होत आहे. सर्वसाधारणपणे 1 जूनला मान्सून केरळात दाखल होतो, मात्र वादळामुळे अद्यापही तो खोळंबला आहे. हवामान विभागाचा 4 जूनचा केरळातील अंदाजही फोल ठरला आहे. आता 8 ते 10 जूनच्या दरम्यान मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पश्चिम बंगाल, बिहारमध्ये उष्णतेची लाट
वायव्य भारतात पुढील पाच दिवसांत कमाल तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढणार आहे, तर मध्य भारतातही पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगणामध्ये उष्णतेची लाट कायम असून, ती 10 जूनपर्यंत राहणार आहे. याशिवाय तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड, उत्तरप्रदेशच्या भागातही पुढील चार दिवस उष्णतेची लाट राहणार आहे.
कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रात पाऊस
पुढील चार दिवस कोकण गोवा किनारपट्टीवर तुरळक पाऊस पडण्याची शक्यता असून, किनारपट्टीवर सोसाटय़ाचा वारा वाहणार आहे. याबरोबरच मध्य महाराष्ट्रातही तुरळक पावसाचा अंदाज आहे. मराठवाडय़ात 9 व 10 जून पाऊस राहणार आहे. विदर्भात हवामान कोरडे राहील.