शिवसेनेतील गद्दार कोण आहे ते संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे; संजय शीलवंत यांचे प्रत्युत्तर
करमाळा/प्रतिनिधी
शिवसेनेचा भगवा खांद्यावर घ्यायचा शिवसेनेच्या व्यासपीठावरून विधानसभा निवडणुकीत प्रचार करायचा मात्र संध्याकाळी घरी गेले की आमदार शिंदे बंधूंच्या इशाऱ्यावर त्यांचे हस्तक म्हणून काम करायचे अशा धनंजय डिकोळे यांनी पक्षात राहूनच सूर्याजी पिसाळ यासारखे काम केले आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये, अशा तिखट शब्दात शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संजय शीलवंत यांनी उत्तर दिले आहे.
पक्षाशी गद्दारी करून बंडखोर उमेदवाराचा प्रचार करणाऱ्यांना शासकीय समितीवर पदे मिळत नसतात, अशा शब्दात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी शीलवंत यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले होते, यावर शीलवंत यांनी उत्तर दिले आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय शीलवंत म्हणाले की 2014 व 2019 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनुक्रमे आमदार नारायण पाटील व रश्मी बागल कोलते उमेदवार होत्या, या दोन्ही निवडणुकीत त्यांनी पक्षाशी गद्दारी केली ,याचा पुरावा मत पत्रिकेतून दिसून आला आहे .गद्दार कोण आहे याचे उत्तर माझी आमदार नारायण पाटील व 2019 शिवसेनेचे उमेदवार रश्मी बागल कोलते शिवसेना वरिष्ठ नेत्यांकडे दिले आहे.
आम्ही बंडखोरी केली ती जाहीरपणे केली पण निवडून आल्यानंतर नारायण पाटील यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेणार ,अशी आश्वासन सगळ्या शिवसैनिकांना दिले होते. उमेदवारी वाटपात नारायण पाटील यांच्यावर अन्याय झाला हे सर्व शिवसैनिकांचे मत असल्यामुळेच सर्वांनी नारायण पाटील यांचे काम केले.
उलट नारायण पाटील यांचे विधानसभेचे तिकीट कापले जावे म्हणून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना नारायण पाटील भाजपमध्ये जाणार आहेत अशा खोटी माहिती देऊन पक्षाची फसवणूक केली. यामुळे शिवसेनेचा करमाळा चा आमदार गमवावा लागला.
या आसुरी पद्धतीच्या धनंजय डिकोळे यांनी आमदार नारायण पाटील यांचे तिकीट कापल्यानंतर कुर्डूवाडी नगरपालिकेच्या पुढे फटाक्याची आतषबाजी करून आपला आनंद व्यक्त केला मात्र विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष आमदार संजय मामा शिंदे यांचा प्रचार केला हे सर्वश्रुत आहे ,मते मतपेटीतून दिसून आली आहेत.
एक वेळ जाहीरपणे बंडखोरी केलेली चांगली पर पक्षातच राहून शिवसेनेचा उमेदवार पाडण्यासाठी केलेली खटाटोप याला कशाप्रकारची गद्दारी म्हणायची,कुर्डूवाडी नगरपालिकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जवळपास शंभर कोटी रुपयांचा निधी मिळाला मात्र मात्र प्रसिद्धी माध्यमातून हा सगळा निधी आमदार संजय मामा शिंदे यांच्या मुळेच मिळाला असा गवगवा करून त्याची जाहिरातबाजी धनंजय डिकोळे करत आहे.
मुंबईत गेले की जय महाराष्ट्र! म्हणायचे ,आणि कुर्डूवाडीत आले की शिंदे बंधूंचा विजय असो !!या भूमिकेत काम करायचे हे आता संपूर्ण शिवसैनिकांनी ओळखले असून वरिष्ठ नेत्यांना ही बाब लक्षात आली आहे.
लवकरच या सर्व बाबीची लेखी पुरावे घेऊन जिल्हा समन्वयक शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली करमाळा व माढा तालुक्यातील सगळे शिवसैनिक सेना भवन ला जाऊन वरिष्ठ नेते पुढे वस्तुस्थिती मांडणार असल्याचे शेवटी शीलवंत यांनी सांगितले.