मासेमारीला होणार सुरुवात, मासेमारीसाठी वातावरण पोषक
प्रतिनिधी/ रत्नागिरी
पावसाळा हा माशांच्या प्रजोत्पादनाचा काळ. या काळात बेसुमार मासेमारी झाल्यास मत्स्य दुष्काळाला समोर जावे लागते, हे टाळण्यासाठी शासनाच्या आदेशाप्रमाणे 1 जून ते 31 जुलै हा मासेमारी बंदी काळ घोषित करण्यात आला होता. आता 1 ऑगस्टपासून मासेमारी बंदीचा काळ संपून प्रत्यक्ष मासेमारीला सुरुवात होणार आहे. 1 ऑगस्टपासून पर्ससीननेट वगळता ट्रॉलिंग, गिलनेटसह फिशिंगच्या नौका समुद्रावर स्वार होण्यास तयार झाल्या आहेत. सध्या पावसाने विश्रांती घेतली असून मासेमारीला पोषक वातावरण असल्याने रत्नागिरी जिह्यात 3 हजारहून अधिक नौकांना मासेमारीसाठी जाता येणार आहे.
महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विभागाकडून प्राप्त निर्देशांनुसार, 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारी बंदी केली जाते. 60 दिवसांच्या मासेमारी बंदीनंतर 1 ऑगस्टपासून नौका पुनश्च समुद्रावर स्वार होणार आहेत. रत्नागिरी जिह्यातील गुहागर, दापोली, रत्नागिरी, राजापूर, मंडणगड या तालुक्यात छोटी-मोठी अशी 27 मासेमारी बंदरे असून त्या ठिकाणी मासळी उतरवून घेण्याची अथवा नौका उभ्या करण्याची सोय आहे. मासेमारी बंदीच्या काळात प्रत्यक्ष मासेमारी जरी बंद असली तरी या काळात बोटीच्या इंजिनाची देखभाल, दुरुस्ती व डागडुजी, बोटीची रंगरंगोटी याबरोबर जाळय़ांची दुरुस्ती व नवीन जाळय़ांची खरेदी मच्छीमारांकडून करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून मासेमारीच्या सुरुवातीच्या काळात समुद्रात चक्रीवादळ व हवामानाच्या दृष्टीने प्रतिकूल हवामान असल्याने मासेमारी हंगामाला उशिराने सुरुवात झाली होती, मात्र यंदा मासेमारीच्या दृष्टीने अनुकूल वातावरण असल्याने शिवाय गेला आठवडाभर पावसाचा जोर ओसरल्याने 1 ऑगस्टपासून चांगल्या प्रमाणात मासळी सापडण्याची आशा मच्छीमारांना आहे.
हवामान विभागाच्यावतीने हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या रत्नागिरीच्या किनारी भागात हलक्या स्वरूपाचा वारा सुटत आहे तर काहेवेळा सोसाटय़ाच्या वाऱयासह आकाशात काळ्य़ा ढगांची दाटीवाटी होत आहे. याशिवाय समुद्रातील पाण्याला करंट आहे. त्यामुळे बंदी कालावधी संपल्याने या बदलत्या वातावरणात व लहरी हवामानात ट्रॉलिंग मच्छीमारी नौका मासेमारीला जाणार आहेत. या मासेमारीच्या हंगामाच्या आरंभीला बांगडा, चिंगळं यासारखी मासळी सापडते. त्यामुळे याचा लाभ उठवण्यासाठी मच्छीमार दरवर्षी सज्ज असतात..
मच्छीमार व्यावसायिक सापडला कात्रीत
शासनाच्या नवीन निर्देशित आदेशानुसार, जिह्यातील 120 अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेच्या नौकांना इंधनामधील सवलत (सबसिडी) मिळणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. यामुळे मच्छीमारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मागील काही वर्षांपासून मासेमारी बोटीला लागणारे इंधन, इंजिन ऑईल, मासेमारी जाळी, एचडीपीई दोर, बोये इ. साहित्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून हे साहित्य महाग झाले आहे. या महागाईमुळे याशिवाय गेल्या काही हंगामांपासून पुरेशा प्रमाणात मासेमारीतून माशांची प्राप्ती होत नसल्याने मच्छीमार व्यावसायिक कात्रीत सापडला आहे.
मच्छीमारी नौकांची आकडेवारीः
एक सिलिंडर नौका 387
– 2 सिलिंडर 565
– 3 सिलिंडर 032
– 4 सिलिंडर 022
– 6 सिलिंडर 1262
– ओबीएम (रॉकेलवरील) 121
– बिगर यांत्रिकी 170
मासेमारीसाठी चांगले वातावरण
पावसाचा जोर ओसरला आहे. शिवाय अधूनमधून एखाद दुसरी क्वचित सर येते. यामुळे मासेमारीसाठी वातावरण चांगले आहे, मात्र मागील शुक्रवारपासून श्रावण महिना सुरु झाल्याने रत्नागिरी जिह्यातील काही मच्छीमार विलंबाने मासेमारीला सुरुवात करतात.
– श्रीदत्त भुते, मच्छीमार
मत्स्य विभागाची राहणार ‘नजर’
1 जून ते 31 जुलैपर्यंतचा मासेमारी काळ संपुष्टात आल्याने समुद्रात आता 1 ऑगस्टला पर्ससीननेट नौका वगळता अन्य मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी 1 ऑगस्टला जाता येणार आहे. मासेमारी करताना मच्छीमारांकडून नियमांचे पालन होतेय की नाही, यावर मत्स्य विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
-एन. व्ही. भादुले, सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय