लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे, तो स्पष्ट खदखदताना दिसत आहे. महाविकास आघाडीमधील नेते भाजपच्या मंचावर जातात त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे, तरी शरद पवारांनी असा संभ्रम निर्माण करू नये अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
उद्या म्हणजे 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांना टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि शरद पवार हे एकाच मंचावर असणार आहेत. देशात इंडिया विरुद्ध एनडीए अशी लढाई सुरु असतानाच या नविन आघाडीचे सुत्रधार असलेल्या शरद पवार हेच पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात उपस्थिती लावणार असल्यामुळे त्यांच्याभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिल्लीमध्ये माध्य़मांशी बोलताना खासदार संजय राऊत आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले कि, “गेल्या काही दिवसांपासून आणि वर्षांपासून देशात सुरु असलेल्या राजकारणामुळे लोकांच्या मनात असंतोषाची भावाना निर्माण झाली आहे. आम्ही शरद पवार यांना कोणताही सल्ला देणार नाही. लोकांच्या मनामधील असंतोषाची भावना स्पष्ट दिसत आहे. कुणाला कोणता पुरस्कार मिळाला…नोबेल अथवा कोणताही पुरस्कार मिळाला, हा ज्याचा त्याचा प्रश्न असून पुरस्कारासंदर्भात आम्ही कोणताही भूमिका घेणार नाही. पण महाविकास आघाडी अथवा इंडियातील नेते भाजपच्य़ा मंचावर जातात, त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होत असून शरद पवार खूप अनुभवी नेते असल्याने त्यांना हा संभ्रम काय आहे हे आम्ही सांगायला नको.” असे स्पष्ट भुमिका मांडली.