ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मागील महिनाभरापासून टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला आहे. 20 ते 30 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो 150 ते 200 रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. अशात केंद्र सरकारने टोमॅटोचे दर नियंत्रणात आणण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. नाफेड आणि सहकारी संघांना आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राष्ट्रीय कृषी सहकारी पणन संघ म्हणजेच नाफेड आणि राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ टोमॅटोची खरेदी करणार आहे. प्रमुख ग्राहक केंद्रांवर स्वस्त दराने हे टोमॅटो वितरीत करण्यात येणार आहेत. एका निवेदनात ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की, 14 जुलैपासून टोमॅटो किरकोळ दुकानांद्वारे कमी दराने ग्राहकांना विकले जातील. मुसळधार पावसामुळे पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे किरकोळ भाव 200 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी किरकोळ किमती गेल्या एका महिन्यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहेत, त्या ठिकाणी टोमॅटो कमी किमतीत वितरित केले जातील. ज्या ठिकाणी टोमॅटोचा वापर जास्त आहे, त्यांना वितरणासाठी प्राधान्य दिले जाईल. जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टोमॅटोचे उत्पादन कमी असते. याशिवाय जुलैमध्ये पावसाळय़ामुळे वाहतुकीशी संबंधित अडचणींमुळेही दर वाढले आहेत. टोमॅटो उत्पादनात दक्षिणेकडील राज्ये आघाडीवर आहेत. नाशिक जिह्यातून लवकरच नवीन पीक येण्याची अपेक्षा असून, आगामी काळात लवकरच टोमॅटोचे दर कमी होतील, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.