सततच्या त्रासाने नागरिक संतापले
बेळगाव / प्रतिनिधी
टिळकवाडी येथील पहिले व दुसरे रेल्वेगेटनजीक एक्स्प्रेस थांबण्याचे प्रकार काही केल्या थांबताना दिसत नाहीत. रेल्वेच्या तांत्रिक चुकांमुळे वाहनचालक वेठीस धरले जात आहेत. शनिवारी तब्बल 20 मिनिटे चन्नम्मा एक्स्प्रेस रेल्वेगेटनजीक थांबल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सकाळी 9.55 वा. पहिले व दुसरे रेल्वेगेट येथे बेंगळूर येथून मिरजच्या दिशेने जाणारी चन्नम्मा एक्स्प्रेस थांबली. बराच वेळ उलटला तरी रेल्वे जागची सरकली नसल्याने नाराजी व्यक्त होत होती. वाहनचालक रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूंनी ताटकळत थांबले होते. 10 मिनिटे होत आली तरी गेट न उघडल्याने अखेर अनेकांनी गोगटे सर्कलमार्गे जाणे पसंत केले. सकाळी 10.15 वा. रेल्वेगेट उघडले. 20 मिनिटे गेट बंद असल्याने वाहनचालकांना मात्र तारेवरची कसरत करावी लागली.
रेल्वेगेटनजीक एक्स्प्रेस थांबणे हे आता नित्याचेच झाले असून दोन दिवसांपूर्वीही अशाचप्रकारे एक्स्प्रेस थांबली होती. वरचेवर हे प्रकार होत असतानाही रेल्वे अधिकाऱयांचे मात्र दुर्लक्ष होत आहे. तांत्रिक बिघाड होत असल्याचे कारण देत हातवर केले जातात. त्यामुळे या समस्येवर ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.