प्रतिनिधी कसबा बावडा
कारखाना प्रशासनाने पोट नियम दुरुस्ती मधील अनावश्यक कार्यक्षेत्रातील वाढ, सातबारा पत्रकी मालकी हक्काचे क्षेत्र नसलेल्याना मिळणारे सभासदत्व, सलग तीन वर्षे ऊस पुरवठा न करणाऱ्या आणि सलग तीन वार्षिक सभांना गैरहजर राहिलेल्या सभासदांचे सभासदत्व रद्द करणे, कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवाराने मागील पाच वर्षात किमान तीन वर्षे ऊस पुरवठा करणे तसेच सूचक व अनुमोदक यांनी सलग चार वर्षे ऊस पुरवठा करणे व किमान सलग चार वर्षे सभेला उपस्थित असणे बंधनकारक असणे अशा जाचक अटी रद्द कराव्यात, अन्यथा राजाराम कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाचे धुरांडे पेटवू देणार नाही. असा इशारा राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने मोहन सालपे यांनी दिला. ते छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या 39 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन आघाडीच्यावतीने घेण्यात आलेल्या श्रीराम विकास सेवा सोसायटीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी डॉ संदीप नेजदार म्हणाले, कागदपत्रांची पूर्तता असणाऱ्या मयत सभासदांचे शेअर्स ट्रान्सफर लवकरात लवकर न केल्यास कारखान्याच्या प्रत्येक बोर्ड मिटींगला जाब विचारणार असून पोटनियम दुरुस्ती म्हणजे सत्ताधाऱ्यांनी कारखान्यावर केलेली मक्तेदारी आहे.
या पत्रकार परिषदेला राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचे मोहन सालपे, डॉ. संदीप नेजदार,श्रीराम सोसायटीचे चेअरमन उमाजी उलपे, व्हा. चेअरमन दत्तात्रय मासाळ, हिंदुराव ठोंबरे, युवराज उलपे, मिलिंद पाटील, अनंत पाटील, धनाजी गोडसे, सुभाष बुचडे, रमेश उलपे, तानाजी चव्हाण, जे. एल. पाटील, अजित पोवार आदी सभासद उपस्थित होते.