प्रत्येक आध्यात्मिक मार्गावरील व्यक्ती साधुसंतांचा संग किती महत्त्वाचा आहे हे जाणते. पण कलियुगाच्या प्रभावाने केवळ बाह्य वस्तुस्थिती पाहूनच कोणाला तरी साधू अथवा संत म्हणून स्वीकारले जाते. सर्वात मोठी अंधश्रद्धा म्हणजे आपल्या जीवनात कोणता तरी फायदा झाला अथवा काहीतरी चांगले घडले तर ज्याला आपण साधू, संत अथवा गुरु मानतो त्याच्या कृपेमुळे झाले असे समजतो. पण हा निव्वळ गैरसमज आहे. जगामध्ये ईश्वरी शक्ती आहे हे श्रद्धाळू लोक मान्य करतात पण ती आध्यात्मिक शक्ती कोण आहे व काय आहे हे अशा लोकांना कळत नाही. म्हणून ते एका साधारण व्यक्तीला भगवंताचा अवतार, गुरु म्हणून स्वीकारतात. अशा अंधभक्तांमुळेच आध्यात्मिक मार्गाचे कोणतेही ज्ञान नसलेली सामान्य व्यक्तीदेखील दोन चार संस्कृत श्लोक म्हणून स्वतःला भगवान अथवा गुरु म्हणवून घेते. कलियुगामध्ये हे सर्रास चाललेले आहे. म्हणून साधुसंत कोण व कोण नाही हे दोन्ही जाणणे महत्त्वाचे आहे अन्यथा आपण फसविले जाऊ शकतो.
संत तुकाराम एका अभंगात म्हणतात, ऐसे ऐसियाने भेटती ते साधू । ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू। जे कां सच्चिदानंदी नित्यानंदु । जे कां मोक्षसिद्धी तीर्थ वंदू रे ।।1।। भाव सर्व कारण मूळ वंदू । सदा समबुद्धी नास्तिक्मय भेदू । भूतकृपा मोडी द्वेषकंदु । शत्रू मित्र पुत्र समकरी बंधू रे ।।2।। मन बुद्धि काया वाचा शुद्ध करी । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारी । लघुत्व सर्व भावे अंगीकारी । सांडी मांडी मीतूं पण ऐसी थोरी रे ।।3।। अर्थकामा चाड नाही चित्ता । मानामान मोह माया मिथ्या । वर्ते समाधानी जाणोनी नेणता । साधू भेट देती तया अवचिता रे।।4।। मनी दृढ धरी विश्वास । नाही सांडीमांडीचा सायास । साधुदर्शन नित्यकाळ त्यास। तुका म्हणे जो विटला जाणिवेस रे ।।5।। अर्थात ‘ज्याच्या दर्शनाने व्यक्ती संसारबंधनातून मुक्त होते, जे सत्चिदानंदामध्ये अर्थात भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये नित्य आनंद प्राप्त करीत असतात, जे मोक्ष प्राप्त करून देऊ शकतात, जे तीर्थक्षेत्रांनाही वंद्य असतात ही खऱया साधूची लक्षणे आहेत. अशा प्रामाणिक हरिभक्त साधूंची भेट होण्यासाठी आपल्यामध्ये (साधकांमध्ये) कोणता भाव असावा आणि कोणती लक्षणे असावीत याचे वर्णन या अभंगात केले आहे. सर्व साधनांचे मुख्य कारण म्हणजे श्रद्धा आहे. तसेच सर्व जिवांविषयी समबुद्धी, नास्तिकपणाचा अभाव आणि भूतदया हृदयामध्ये असावी लागते. द्वेषाचे मूळ कारण जी भेदबुद्धी ती नष्ट झाली पाहिजे. शत्रू, मित्र, पुत्र आणि बंधू याना समान मानले पाहिजे. काया, वाचा, मन आणि बुद्धी याना शुद्ध करावे. सर्वत्र पांडुरंगाचे रूप पाहून सर्वाना नमस्कार करावा. काया, वाचा आणि मनाने स्वतःकडे लहानपणा घ्यावा. ‘मी-तू’ असा भेद टाकून द्यावा. सर्वत्र भगवद्भाव ठेवावा आणि ज्यामुळे भेद निर्माण होतो असा अभिमान टाकून द्यावा. अर्थ कामाची इच्छा नसावी, मान, अपमान, मोह आणि प्रेम हे सर्व विकार मिथ्या आहेत असे जाणावे. प्रारब्धाने जी स्थिती प्राप्त झाली असेल त्या स्थितीत समाधानाने रहावे. सर्व शास्त्रे शिकूनही त्याचा अभिमान न ठेवता नम्र रहावे. अशी लक्षणे ज्याच्यामध्ये आहेत त्याला प्रामाणिक साधू भेटतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने आपल्या मनात संत आणि भगवंत याविषयी श्रद्धा ठेवली आहे, जो इतर खटाटोपाचे कष्ट करीतच नाही, जो खरोखरच ज्ञानाच्या अहंकाराला विटला आहे. त्याला केव्हाही सहजगतीने साधूचे दर्शन होते.’ साधूची लक्षणे काय आहेत आणि अशा साधूला ओळखण्यासाठी तशीच लक्षणे ज्याच्याकडे आहेत त्याला प्रामाणिक साधूची भेट होते हा या अभंगाचा आशय आहे.
वरील अभंगात साधूची लक्षणे सांगितली आहेत. त्याचप्रमाणे संत कोण नाहीत याविषयी तुकाराम महाराज म्हणतात, नव्हती ते संत करीता कवित्व। संतांचे ते आप्त नव्हती संत ।।1।। येथे नाही वेश सरते आडनांव । निवडे घावडाव व्हावा अंगी ।।2।। नव्हती ते संत धरितां भोपळा । करितां वाकळा प्रावर्णासी।।3।।नव्हती ते संत करितां कीर्तन । सांगता पुराण नव्हती संत ।।4।। नव्हती ते संत वेदांच्या पठणे। कर्म आचरणे नव्हती संत ।।5।। नव्हती ते संत करीता तप तीर्थाटन । सेवलिया वन नव्हती संत ।।6।।नव्हती ते संत माळामुद्रांच्या भूषणे। भस्म उथळणें नव्हती संत ।।7।। तुका म्हणे नाही निरसिला देहे। तोंवरि आघवे संसारिक।।8।। अर्थात ‘भगवंताचे गुणगान करणाऱया कविता लिहिल्या म्हणून कोणी संत होत नाहीत, त्याचप्रमाणे संतांचे नातेवाईक आहेत म्हणून कोणी संत होत नाहीत. संतांसारखा वेष धारण केला म्हणून कोणी संत होत नाहीत आणि संत आडनाव आहे म्हणून कोणी संत होत नाहीत. शत्रूचे घाव सहन करून जो टिकाव धरतो तो जसा खरा शूर त्याचप्रमाणे संतपणाचे आध्यात्मिक गुणही अंगी असले पाहिजेत. हातात भोपळा (वीणा) धरून आणि वाकळ (उपरणे) पांघरून कोणी संत होत नसतात. कथा-कीर्तन केल्याने किंवा पुराणातील कथा सांगतात म्हणून ते संत नव्हेत. वेदपठण करून त्यानुसार कर्मकांड केल्याने संत होत नाहीत. घोर तपश्चर्या केली, अनेक तीर्थस्थानांना भेटी दिल्या, वनामध्ये वास्तव्य केले म्हणून संत होत नाहीत. गळय़ामध्ये माळा घालून, अंगावर द्वादश मुद्रा लावून अथवा भस्म लावून कोणी संत होत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत देहभावनेतून मुक्त होत नाहीत तोपर्यंत वरील बाह्य लक्षणे असली तरी तो संसारिकच आहे.
आध्यात्मिक जीवन म्हणजे हरिभक्ती, याच मार्गाने अनेक साधू संत गेले आहेत. त्यामुळे नवीन मार्ग शोधून काढण्याची गरज नाही आणि स्वतःच्या मनाप्रमाणे आणि मताप्रमाणे न वागता गीता-भागवत हे शास्त्र प्रमाण म्हणून स्वीकार केल्यास आध्यात्मिक मार्ग अतिशय सोपा आणि सुखकर होतो. मार्गी बहुत । याची गेले साधुसंत।।1।। नका जाऊ आड राने । ऐशी गर्जती पुराणे ।।2।। चोखाळिल्या वाटा। न लगे पुसाव्या धोपटा ।।3।। झळकती पताका। गरुडटके म्हणे तुका ।।4।। अर्थात ‘हरिभक्तीच्या मार्गाने अनेक साधुसंत याआधी गेले आहेत. म्हणून तुम्हीही हा मार्ग सोडून आडमार्गाने जाऊ नका अशी गर्जना पुराणांनी केली आहे. ही हरिभक्तीची वाट स्वच्छ केलेली असल्याने इतर कोणास विचारण्याची गरज नाही, कारण या सरळ मार्गाने भगवंताकडे जाता येते. तुकाराम महाराज म्हणतात, या मार्गाने जाणाऱया वैष्णवांच्या खांद्यावर गरुडाचिन्हांच्या भगव्या पताका झळकत आहेत.’ भागवत धर्म हा स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला सरळ सोपा मार्ग आहे. त्यासाठी या मार्गावर चालण्यासाठी कोणत्याही तर्काची अथवा अनेक लोकांचे अनुभव ऐकून नवा मार्ग शोधण्याची गरज नाही. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात (भ गी 4.10) वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः । बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः अर्थात ‘आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे मत्परायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेकानेक मनुष्य माझ्याविषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि याप्रमाणे त्या सर्वाना माझ्याविषयीच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे.’ आपल्या सर्व दुःखाचे मूळ आहे कर्मबंधन अर्थात भगवंताच्या आदेशाचे पालन न करणे. पण जर गीता-भागवत या शास्त्रामध्ये दिलेल्या आदेशांचे पालन केल्यास आपण सर्व कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. यासाठी भगवान श्रीकृष्ण सांगतात (भ गी 3.31) ये मे मतमिदं नित्यमनुति÷न्ति मानवाः । श्रद्धावन्तो।़नसूयन्तो मुच्यन्ते ते।़पि कर्मभिः अर्थात ‘जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात’. या सरळ मार्गाने हरिभक्त जातात आणि इतरांना भागवत धर्माची गरुडध्वज भगवी पताका खांद्यावर ठेवून मार्गदर्शन करतात. असे निस्वार्थी हरिभक्त हेच खरे साधुसंत आहेत.
-वृंदावनदास