मिनी टेम्पोची ट्रकला धडक, टेम्पोचालक ठार : ट्रकला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
वार्ताहर /तवंदी
तवंदी घाट हा दिवसेंदिवस वाहतुकीसाठी धोकादायक बनत चालला आहे. तवंदी घाटात 24 तासात झालेल्या दोन विविध अपघातांमध्ये दोघेजण जागीच ठार झाले. तर एकजण जखमी झाला. प्रशासनाने आता सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक ती कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
पहिल्या अपघातामध्ये तवंदी घाटात मिनी टेम्पोची ट्रकला धडक बसल्याने एकजण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास घडली. आप्पाराव किसन जाधव (वय 38, मुळगाव बीड, सध्या राहणार पुणे) असे मृताचे नाव आहे. वाहनातील अन्य एकाने प्रसंगावधान राखत वाहनातून उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला पण तो जखमी झाला आहे.
घटनेविषयी पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, मालवाहू ट्रक क्रमांक (केएल 38 ई 7340) हा कोल्हापूरहून बेंगळूरच्या दिशेने जात होता. त्याच दरम्यान आप्पाराव जाधव हा मिनी टेम्पोने (एमएच 14 एचयु 3266) बेळगावच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. त्यावेळी आप्पाराव याचा गाडीवरील ताबा सुटल्याने मिनी टेम्पोची समोरुन जाणाऱया मालवाहू ट्रकला जोराची धडक बसली. यात टेम्पो चालक आप्पाराव हा जागीच ठार झाला.
प्रसंगावधान राखत वाहनात बसलेले सिद्धगौडा आप्पासाहेब मस्ती (रा. अंकले) यांनी टेम्पोतून उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला मात्र ते जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसूर, हवालदार एस. एच. चिकोडे, मंजुनाथ कल्याणी, एस. एस. बाडकर यांच्यासह जयहिंद कंपनीचे कर्मचारी अमोल नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. रुग्णवाहिकेतून मृतदेह व जखमीला गांधी रुग्णालयात दाखल केले. अपघातात मिनी टेम्पोचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे.
दुचाकी -ट्रक अपघात दुचाकीस्वार जागीच ठार
दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकी व ट्रक अपघातात दुचाकीस्वार ट्रकच्या मागील चाकात सापडून जागीच ठार झाला. जाफर दिलावर नाईकवाडे (वय 40, रा. सोलापूर, ता. हुक्केरी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मालवाहू ट्रक (क्रमांक के. ए. 47 3353) हा कोल्हापूरहून बेंगळूरच्या दिशेने जात होता. दरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याच वेळेला दुचाकीस्वार (क्रमांक 6343) जाफर हा निपाणीहून सोलापूर या गावी जात होता. दरम्यान तवंदी घाट चढत असताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो ट्रकच्या मागील चाकात सापडला. त्यामुळे मागील चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. जयहिंद कंपनीचे कर्मचारी प्रकाश बामणे, क्राईम पीएसआय एस. जी. खानापुरे, हवालदार एस. एच. चिकोडे, मंजुनाथ कल्याणी आदींनी पंचनामा केला.
तवंदी घाट ठरतोय मृत्यूचा सापळा तवंदी घाटात अपघातांच्या संख्येत वाढ होत असून हा घाट वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या कंटेनर-कार अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा ट्रक-टेम्पो अपघातामुळे एकाचा बळी गेल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच तवंदी घाटात उतार देखील धोकादायक बनले असून मार्गावर पथदीप नसल्याने रात्रीचा प्रवास धोकादायक बनला आहे. त्याची दखल घेत उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.