ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कुतूब मिनारचे नाव बदलून विष्णू स्तंभ करा, या मागणीसाठी हिंदु संघटनांनी आज कुतूब मिनार परिसरात हनुमान चालीसा पठण करून घोषणाबाजी केली. (demand of Hindu organizations Declare Qutub Minar a Vishnu stambh) युनायटेड हिंदू फ्रंटचे कार्यकारी अध्यक्ष जय भगवान गोयल यांनी या आंदोलनाचं आयोजन केलं होतं. गोयल यांनी इतर हिंदू संघटनांनाही कुतूब मिनार परिसरात हनुमान चालीसा पठणामध्ये सहभागी होण्यासाठी बोलावलं होतं.
कुतूबमिनार हा पूर्वीचा विष्णूस्तंभ आहे. जैन आणि हिंदूंची 27 मंदिरं तोडून तो बांधण्यात आला आहे, असा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. जुन्या दिल्लीतील जागतिक वारसा असलेल्या कुतूब मिनारला विष्णू स्तंभ घोषित करा, अशी मागणी ‘महाकाल मानव सेवा’ या हिंदू संघटनेनं केली. यासाठी कुतूबमिनार परिसरात भगवे झेंडे घेऊन घोषणाबाजी केली. तसेच हनुमान चालीसेचं पठण केलं. या ठिकाणी पुजेची परवानगी देण्याचीही मागणी केली. यावेळी आंदोलकांनी ही वास्तू कुतुबुद्दीनने बांधली नसून सम्राट विक्रमादित्य यांनी बांधल्याचाही दावा केला. दरम्यान, पोलिसांनी घोषणाबाजी करताना संघटनेच्या काही कार्यकर्त्यांची धरपकड केली. सध्या कुतूब मिनार परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मागील महिन्यात विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी म्हटलं होतं की, कुतूब मिनार हा प्रत्यक्षात विष्णू स्तंभ आहे. 27 हिंदू आणि जैन मंदिरांना उद्धवस्त करुन त्यातील सामग्रीच्या माध्यमातून कुतूब मिनार उभारण्यात आला होता. याची सुपरइम्पोझ्ड रचना ही केवळ हिंदू समाजाला डिवचण्यासाठी बनवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला होता.