अध्याय चोविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, भोगासक्ती म्हणून जेथपर्यत आहे, तेथपर्यंत हा पुनरावृत्तीचा फेरा आहेच. मी गीतेत सांगितल्याप्रमाणे ब्रह्मलोकापर्यंत पोहोचलेले साधक भोगवासनांमुळे परत येतात पण ज्याला माझी भेट होते तो मला येऊन मिळत असल्याने त्याचे जन्ममरणाचे फेरे चुकतात. ब्रह्मादि लोक ते सारे माघारे घालिती पुन्हा । माझी भेट घडे तेव्हा जन्मणे मग खुंटले ।। गीता 8.16 ।। ज्याची भोगाचीच इच्छा नाहीशी होते, त्याच्या चारही मुक्ती दासी होऊन राहतात. जे माझी भक्ती करतात त्या माझ्या भक्तांना निश्चितच माझी गती प्राप्त होते. ते सरळ माझ्या लोकात येऊन स्थिरावतात. जे मनात काही इच्छा धरून माझी सेवा करतात, त्यांना वासनेच्या फळातच रहावे लागते परंतु ज्यांना माझी निष्काम भक्ती प्रिय असते, त्यांना माझी अनन्य प्राप्ती होते. सकाम भक्तांच्या वासना मी पूर्ण करतो. ह्यामागे उद्देश असा की, वासना कितीही पुरवल्या तरी त्यांची तृप्ती होत नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि वासना करण्याचं सोडून द्यावं.
अशा प्रकारे त्यांना मी निष्काम करत असतो. मी पुरुषोत्तम, माझ्या भक्तांना आपणहून निजधामाला घेऊन जातो. ज्या भक्तांना सलोकता आवडत असेल त्यांना वैकुंठात राहावयास घेऊन जातो. भक्ताने समीपता मागितली, तर मी त्याला आपला जिवलग मित्र करतो. कशाला म्हणशील तर मनीचे हितगुज सांगायला, मनातील गोडगोड गोष्टी बोलायला! उद्धवा! तू मला जसा आवडतोस, त्याचप्रमाणे मी त्याच्यावर प्रीती करतो. भक्ताने सरूपता मागितली तर त्याला मी चतुर्भुज करतो, आणि शंख-चक्रादिक आयुधे त्याला देऊन मेघाप्रमाणे सुंदर सावळा वर्ण देतो. त्याच्या डोक्मयावर माझ्याप्रमाणेच मुकुट असतो. त्याशिवाय, कुंडले, मेखळा, नेसावयाला पिवळा सोनसळा पीतांबर, वाकी, पायात तोडर आणि गळय़ामध्ये माझ्यासारखाच कौस्तुभमणिही असतो. आकारस्वरूप, गुणलक्षण, वीर्य, शौर्य, पूर्ण गांभीर्य, रूपलक्षणे हीही अगदी सारखीच असतात. त्यामुळे दोघेही स्वरूपाने अगदी एकसारखेच असतो. लक्ष्मीने जर दोघांना एकत्र पाहिले, तर मी कोणता हेसुद्धा तिला ओळखत नाही. सेवकांचे सेवाकर्म थांबते कारण त्यांना कोणाची सेवा करावी हेच कळत नाही. छत्र धरणारा मनात दचकून म्हणतो की, मी आता छत्र तरी कोणावर धरू? चवरी वारणाराने हातात चवरी धरून कोणावर वारावी? ब्रह्मादि देव नमन करावयाला येतात, तेही मोठे आश्चर्य वाटते. दोघांमध्ये आदिदेव कोणता हे त्यांना स्वतःलाही कळत नाही. ज्याप्रमाणे दिव्याने दिवा लावला म्हणजे पहिला कोणता व दुसरा कोणता हे समजत नाही, त्याप्रमाणेच माझी सरूपता प्राप्त झाली म्हणजे इतरांना तोही ओळखता येत नाही. ज्याप्रमाणे आरशातलं प्रतिबिंब हुबेहूब सारख्याच स्वरूपाचे दिसत असल्यामुळे तेच स्वयमेव बिंब आहे असे वाटते, त्याप्रमाणेच सरूपतेची शोभा असते. दोहोचाही थाट सारखाच. देव प्रसन्न होऊन जरी आपली पूर्ण सरूपता देतो, तरी हृदयावर उमटलेले ब्राह्मणाचे पाऊल-जे अविनाशी श्रीवत्सलांछन-ते मात्र मी देत नाही. याचं कारण म्हणजे, श्रीवत्सचिन्ह देण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही. ते सामर्थ्य ब्राह्मणांच्या पायात आहे, त्या ब्राह्मणांचे चरण हृदयात धरले तरच ते मिळेल. सरूपतेमध्ये देवाची आणि भक्ताची निराळेपणा ओळखण्याची खूण हीच की, ज्याच्या हृदयावर श्रीवत्सलांछन असते तोच सर्वांचा स्वामी श्रीविष्णु होय. अशा प्रकारची सरूपता जरी प्राप्त झाली, तरी हा एक देव आणि हा एक भक्त, असा भिन्नत्वाचा भेदभावाचा किंतु त्यांच्यामध्ये शिल्लक राहातोच. देव आणि भक्त ह्यांच्यामध्ये जोपर्यंत भेद आहे, तोपर्यंत सरूपता म्हणणे हेही अयुक्तच होय. कारण, जोपर्यंत अद्वयज्ञान झाले नाही, तोपर्यंत परमानंद उत्पन्न होत नाही. म्हणून भिन्नत्वाची भेदवार्ता सोडून भक्त सायुज्यताच मागतो. त्या निरूपणाची कथा फार गोड आहे. त्यातील गोष्टी फक्त मीच जाणतो. सायुज्याची जी गोडी आहे ती उद्धवा! मी तुला सर्व सविस्तर सांगेन.
क्रमशः