महिन्यात आलेल्या वैकुंठ चतुर्दशी, कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा गुरुनानक जयंती या सगळय़ाचंच महात्म्य आपण ऐकणार आहोत. खरं म्हणजे हा सगळा त्रिवेणी संगम पूर्णत्वाचा त्रिगुणशक्तीचा परिचय आपल्याला मिळतो. वामन अवताराच्यावेळी बळीला असुरशक्ती नष्ट करताना त्याला दिलेल्या वचनाप्रमाणे चार महिने पाताळात राहणारे विष्णू आषाढी एकादशी म्हणजेच शयनी एकादशीला विश्रांतीसाठी आणि कार्तिकी एकादशीला पृथ्वीवर परत प्रकट होतात किंवा निदेतून जागे होतात. हा चार महिन्याचा काळ शंकरांवर जबाबदारीचा येतो. सगळय़ा पृथ्वीचा कारभार बघायची वेळ त्यांच्यावर येते. कार्तिकी एकादशीला शिव आणि विष्णू आवळीवनात भेटतात. शिवाची जबाबदारी पुन्हा आपल्या खांद्यावर विष्णू घेतात. ही दोन रूपं असली तरी शक्ती एकच तत्व एकच, याची खुणगाठ म्हणजे हा दिवस. सर्वसामान्यांच्या मनात ही खुणगाठ रुजवण्याचा हा सोहळा. दोघांच्या आवडीनिवडी जरी भिन्न असल्या म्हणजे शंकराला बेल आणि विष्णुला तुळस आवडत असली तरी या दिवशी बेलाचा अभिषेक विष्णुला करतात तर तुळशीचा अभिषेक शंकरांना. चातुर्मासाचे अधिपती श्री शंकर असल्याने त्यांच्याप्रमाणे अनु÷ानचे व्रत या महिन्यामध्ये केलं जातं. अनेक दोष घालवले जातात. या चातुर्मासात शंकराप्रमाणे निराहारी एकभक्त किंवा एकनक्त राहणं फार कठीण पण अनेक लोक ते आचरणात आणतात. आचार विचारांची शुद्धी करतात. त्या भेटीचा हा सोहळा म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा.
भागवतात आलेली त्रिपुरारी राक्षसाची कथा या पौर्णिमेचे महत्त्व वाढवते. त्रिपुरारी राक्षसाने देवांवर विजय मिळवून तीन वैभवशाली नगरं निर्माण केली होती. मद, मोह, मत्सर अशा या तीन नगरांपर्यंत देव पोहोचू शकत नव्हते आणि असुरक्षिता वाढीला लागल्या होत्या. या राक्षसाला मारण्यासाठी शंकरांना बोलावून घेतले गेले. पुढे मोठे घनघोर युद्ध झाले. त्यामध्ये त्रिपुरारी राक्षसाला त्रिशूलाने ठार केले गेले. त्याची तीनही नगरे आपल्या तिसऱया डोळय़ांनी शंकरांनी भस्मसात केली. ही नगरं इतकी प्रचंड मोठी होती की पुढे अनेक वर्ष ती जळत होती. या कथा, सगळय़ा या पौर्णिमेला घडल्यामुळे त्रिपुराच्या वाती जाळून आम्ही प्रतिकात्मक राक्षसी वृत्तीला जाळतो.
उपवास करतो तरी पण एक प्रश्न मनात राहतो, आमच्यातील मद मोह .. का जळत नाहीत? ही तीन नगरं. म्हणजे साडेतीन मात्रांनी बनलेले आमचे शरीर या वृत्तीने ग्रासलेले असताना त्याला नष्ट करण्याचा निश्चय करायला लावणारी ही पौर्णिमा अतिशय महत्त्वाची ठरते.