अध्याय चोविसावा
कैलासलोकाबद्दल सांगताना भगवंत म्हणाले, सर्व जीवांना सुखदायक, पार्वतीचा परमेश्वर, योग्यांचा योगेश्वर, असा तो शंकर कैलासात राहतो. तो आपल्या भक्तांना सदोदित अभय देणारा व वरदायक, त्रिविध तापांचा उच्छेद करणारा आणि तिन्ही लोकांना सुखी करणारा आहे. रामनामजपासाठी तो त्याच्या हातातील जपमाळा नेहमी तत्पर ठेवतो. शंकराच्या नामोच्चाराच्या धाकानेच कळिकाळ दूर पळून जातो. कैलास पर्वत नेहमी शिवनामाचीच गर्जना करीत असतो आणि त्या ठिकाणी शंकर राज्य करतो. तो ईश्वर भक्तांसाठी मोठा कृपाळू असून भाविकांना नेहमी अगदी भोळेपणाने वश होणारा आहे. सत्व, रज, तम हे तीन गुण आपल्या भक्तांचे शत्रु आहेत आणि ते त्यांना काही केल्या दाद देत नाहीत हे लक्षात घेऊन त्या त्रिगुणांचा संहार करण्याकरिताच त्याने हातात नेहमी त्रिशूळ धारण केलेला आहे. तो आपल्या डमरूच्या गजराने पातकाला पूर्णपणे नष्ट करितो. याप्रमाणे ब्रह्मांडाच्या बाहेर शंकरांनी आपल्याच लीलेने कैलास पर्वत निर्माण करून त्याची स्थापना केली आणि तेथेच भवानीसह ते राज्य करतात. आता वैकुंठलोकातली स्थितीही तुला सांगतो, ऐक. वैकुंठलोकातील स्थिती ऐकताना मन स्वानंद आणि स्फूर्तीने तुडुंब भरून वाहू लागते. ऊस पिळून त्याचा रस काढतात, तो आटवून त्याची साखर करतात आणि अत्यंत कुशल लोक तिचेही अनेक आकारांचे पदार्थ करतात त्याप्रमाणेच श्रीभगवंताने स्वतःच्या सामर्थ्याने राहाण्याकरिता खरोखर चैतन्यच मुशीत घालून आटवून त्याचेच वैकुंठ रचले असे म्हंटले तरी चालेल.
चैतन्याला मुशीत घालून त्याला निरनिराळे आकार दिल्यामुळे ते अधिकच सळसळू लागते तसेच वैकुंठाचे आहे. आपल्याच लीलेने गोविंदाने तेथील प्रत्येक गोष्ट चैतन्यपूर्ण केलेली आहे. तेथे गोविंदा स्वतः सगुण, साकार रूपात वावरत असतो. गोविंदाची सगुण मूर्ती सुकुमार, अत्यंत सुंदर, घनश्याम, मनोहर अशी सुंदर असून त्याने शंख, चक्र, पद्म, गदा अशी चार आयुधे चार हातात धरलेली आहेत. अशा त्या सगुणस्वरूपी गोविंदाला पाहून आनंदाने डोळे लुब्धच होऊन जातात. त्याने मुकुट, कुंडले, मेखला धारण केलेल्या असून पिवळा सोनसळा पीतांबर नेसलेला आहे. गळय़ात कौस्तुभ मणि झळकत आहे. पायापर्यंत लोंबणारी वनमाळा गळय़ात शोभत आहे. चरणांपासून निघालेली गंगा तर अत्यंत पवित्र, ती जगालाच पुनीत करून सोडते. अशी ती गंगा शंकरांनी आपल्या मस्तकावरच धारण केली.
त्या श्रीहरीच्या दोन्ही पायांचे वर्णन करताना वेदही मुका होऊन बसला. कारण, ते श्रीहरीचे पद केवळ अगम्य आहेत. श्रीहरीच्या चरणांचा महिमा फार मोठा आहे. त्या श्रीहरीचे अतिसुंदर मुख पाहिले म्हणजे अमृतही फिके होऊन जाते आणि डोळय़ांना अप्रतिम सुख वाटते. श्रीहरीचे ते आल्हादकारक मुख धन्य होय. ज्याचे मुख निमिषार्ध अवलोकन केले तरी कोटिजन्मांचे दुःख नाहीसे होते आणि होणारा आनंद त्रिभुवनातही मावत नाही, अशा त्या श्रीहरीचे ते आल्हादकारक मुख धन्य होय. ज्याचा मुखचंद्र पाहिला असता सुखदुःखादि द्वंद्वांची बाधा मुळीच पीडा देऊ शकत नाही, अधिकाधिक परमानंदच प्राप्त होतो, असा तो सर्व जगाचा आत्मा आनंदाचे मूळ आहे. त्याच्या कटाक्षाची ताकद अशी की, त्याची कमानदार भुवई दृष्टिक्षेप टाकताना किंचित् वाकडी होताक्षणीच कित्येक ब्रह्मांडे तात्काळ उत्पन्न होतात. ज्याच्या प्रत्येक रोमरंध्रांत कोटय़वधी ब्रह्मांडे राहतात, असा तो श्रीहरि वैकुंठामध्ये निवास करतो. ज्याची कृपादृष्टि झाली असता अहंकाराची गाठच तुटून पडते आणि सृष्टीमध्ये दुसरे म्हणून काही दिसूच देत नाही, तो श्रीहरि वैकुंठामध्ये नांदत आहे. अहो! ज्या प्रभूचे नामस्मरण जन्ममरणालाच नाहीसे करून टाकते, कर्माकर्म मुळासकट उपटून टाकते, तो पुरुषोत्तम वैकुंठात नांदत आहे. त्या वैकुंठात खरोखर सर्व लोक चतुर्भुज असतात. सर्वच लोक मेघासारख्या श्यामरंगाचे, पीतांबर धारण करणारे व सर्वांच्याच हातात शंख-चक्र इत्यादि आयुधे असतात.
क्रमशः