ऑनलाईन टीम / तरुण भारत :
‘Vande Bharat Express’ accident for the second time मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसला सलग दुसऱ्यांदा अपघात झाला आहे. शुक्रवारी गांधीनगरहून मुंबईला जात असताना गाई रेल्वे रुळावर आल्याने एक्स्प्रेसला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, एक्स्प्रेसच्या पुढील भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. कंझरी ते आणंद दरम्यान शुक्रवारी दुपारी 3 वाजून 44 मिनिटांनी हा अपघात झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर हायटेक वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसचा शुभारंभ केला. ही एक्स्प्रेस सुरू होऊन आठवडा उलटत नाही तोच या एक्स्प्रेसला सलग दुसऱ्यांदा अपघात झाला. या एक्स्प्रेसला गुरुवारी पहिला अपघात झाला होता. ट्रेन क्रमांक 20901 वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस मुंबईहून अहमदाबादला येत होती. यादरम्यान वटवा ते मणिनगर स्थानकाजवळ म्हशींचा कळप रेल्वे मार्गावर आला होता. या धडकेत चार म्हशीं ठार झाल्या होत्या. यात नव्या कोऱ्या वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसचेही मोठे नुकसान झाले होते.
अधिक वाचा : परदेशी निधी प्रकरणात इम्रान खान यांच्या अटकेची शक्यता
त्यानंतर शुक्रवारी या एक्स्प्रेसला दुसरा अपघात झाला. या अपघाताप्रकरणी गाई मालकाविरोधात रेल्वे पोलिसांनी रेल्वे अधिनियम 1989 च्या कलम 147 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.