अध्याय विसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा भक्तीच्या बदल्यात कशाचीही अपेक्षा न करणे हेच सर्वश्रे÷ आहे. म्हणून ज्याला कोणतीही कामना किंवा अपेक्षा नाही, त्याच्यातच माझी भक्ती निर्माण होते. जो नितान्त निरपेक्ष असतो, तो महापुरुष मला पूज्य असतो. त्याच्या दृष्टीला मोक्ष हा केवळ भुसासमान वाटतो. तशा पुरुषाला चारी पुरुषार्थ फोल वाटतात. वैकुंठ, कैलास आदिकरून जी स्थाने केवळ श्रे÷ म्हणून समजतात, ती भक्तांच्या एव्हढी जवळ असतात की, भक्तीच्या जोरावर त्यांना ती पायवाटेसमान म्हणजे सहज जाताजाता पोचता येईल अशी वाटत असतात. निरपेक्ष मनुष्यापाशी देवसुद्धा चालत येतात. मग ऋद्धिसिद्धींची काय कथा? माझा जो भक्त निरपेक्ष असतो, तो माझ्यासारखाच समर्थ असतो कारण, तो खरोखर मीच असतो. मी परमात्मा परमानंदस्वरूप आहे म्हणून भक्तही माझ्या भजनाने शुद्ध स्वानंदस्वरूपच बनतो. असे माझ्या भक्तीने संपन्न झालेले माझे भक्त गुणदोष पाहात नाहीत. त्याचविषयीचे निरूपण ऐक. जे बुद्धीच्याही पलीकडे असलेल्या परमात्मतत्त्वाला प्राप्त झाले आहेत, त्या माझ्या समदर्शी महात्म्यांचा आणि माझ्या अनन्यप्रेमी भक्तांचा, या विधिनिषेधांद्वारे होणाऱया पुण्यपापांशी काहीही संबंध असत नाही. जो विषमभेद पाहात नाही, ज्याला समत्वाचा निजबोध झालेला आहे, त्यालाच शुद्ध ‘साधु’ असे म्हणतात. त्यालाच माझ्या भजनाने परमानंदाचा लाभ होतो. सर्व प्राणिमात्रांमध्ये एक मीच परमात्मा भरलेला आहे, अशी त्याची दृष्टि झाल्यामुळे द्वैताची प्रतीती त्याला दिसतच नाही. अशी ज्याची भजनस्थिति असते, तिलाच ‘एकांतभक्ति’ असे म्हणतात.
जे निरंतर सर्वत्र समभाव ठेवून एकाग्रमनाने माझ्या भजनांत अति तत्पर राहातात, ते प्रकृतीच्या पलीकडे जाऊन माझ्यासारखेच होतात. असे मद्भावाने परिपूर्ण भक्त गुणदोष कधीच पाहात नाहीत. जर साखरेची जर साले काढता येतील, कापराचा कोंडा निघेल, रत्नाच्या तेजाची काजळी धरेल, तरच माझे भक्त सृष्टीत गुणदोष पाहतील. गुणदोष न पाहण्याचे कारण म्हणजे अवगुणी किंवा गुणी व्यक्ती माझीच रूपे आहेत हे भक्त लक्षात घेतो आणि मत्स्वरूपानेच सारी सृष्टि पाहतो. गुणदोष पाहूच नयेत हेच सर्व साधनात मुख्य साधन आहे. अशा प्रकारे जे लोक मी सांगितलेल्या ज्ञान, भक्ती आणि कर्ममार्गाचा आश्रय घेतात, ते माझ्या परमकल्याणस्वरूप अशा धामाला प्राप्त होतात कारण परब्रह्मतत्त्व त्यांनी जाणलेले असते. उद्धवा! अशा रीतीने मी वेदवाणीने स्वतः भक्ति, ज्ञान आणि कर्मयोग यांच्या द्वारे लोकांना उपदेश केला आहे. कर्मानेच कर्मे नाहीशी करावीत हेच कर्मयोगांतील रहस्य आहे आणि स्वधर्मकर्मानेच माझी प्राप्ती होते, हेही मी तुला सांगितले आहे. नित्य कोणते व अनित्य कोणते, याचा विचार करून अनित्य असेल ते नाहीसे करून टाकणे, हे ज्ञानयोगाचे लक्षण होय. माझी भक्ति केली असता सारी फळे येऊन पायी लागतात आणि भक्तांना अनायासेच माझी प्राप्ती होते. अधिकारभेदाप्रमाणे त्रिकांडातील तीन प्रकारचे वेदमार्ग हेही माझ्या प्राप्तीची उत्तम साधने आहेत.
मी सांगितलेल्या वेदमार्गाचे जो अनु÷ान करील, त्याला आपल्या आवडीप्रमाणे सगुण किंवा निर्गुण अशा पाहिजे त्या स्वरूपाची प्राप्ती होते. मंत्रांच्या योगेकरून आपले आराध्य दैवत प्रसन्न करून घेता येते असे वेदवेत्यांचे म्हणणे आहे. सगुणसाक्षात्कारात, वैकुंठालाच मुख्य म्हणतात. सात आवरणांच्या बाहेर आणि मायावरणाच्या आत श्रीहरीने वैकुंठाची रचना केली आहे, असे वेदान्तात म्हटले आहे. भगवंताने आपल्या लीलेने वैकुंठ रचलेले आहे, म्हणून त्याला नाश नाही. जेथे लीलेने इच्छित देह धारण करणारा मेघकांतियुक्त प्रत्यक्ष पुरुषोत्तम राहात असतो, तेथे गुण, काळ, कर्म किंवा माया इत्यादि भ्रम राहात नाहीत. असे जन्म व मरणरहित वैकुंठ हे अक्षयी व नित्यच असते. उद्धवा! तेथे जे जाऊन पोचतात ते नित्यमुक्त होतात.
अध्याय विसावा समाप्त