कळंबा,वार्ताहर
Kalamba Lake Kolhapur News : कळंबा गावात सध्या दूषित व हिरवट दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा सुरु आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा कळंबा तलावाच्या पाणी प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढत्या पाणी प्रदुषणाकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. तलावामधील शुद्ध जलसाठा अबाधित राखण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने वेळीच योग्य पाऊले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा कळंबा तलावाची अवस्था लवकरच रंकाळा तलावासारखी होणार आहे. कळंबा तलावाची पाणी पातळी घटल्याने प्रतिवर्षी मार्च ते पावसाळ्यापर्यंत गाळयुक्त पाण्याचा पुरवठा होतो. मात्र यंदा पाण्याच्या प्रदुषणामध्ये वाढ झाल्याने पाणी हिरवट झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून गावामध्ये दुर्गधीयुक्त पाण्याच्या पुरवठा सुरु आहे.
गावामध्ये एकदिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांकडून पाण्याची साठवणूक केली जात आहे. दोन दिवस पाणी ठेवल्यास पाण्याच्या तळामध्ये जाळी धरत अळ्यांची निर्मिती होत आहे. गावात गेल्या तीन चार वर्षांपासून डेंग्युची साथ पसरत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गावामध्ये साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे.
महापालिका व ग्रापमंचायतीने केला उपसा कमी तलावाची पाणीपातळी खालावल्याने तसेच पाण्याला हिरवट रंग आणि दुर्गंधी येत असल्याने महापालिकेने व कळंबा ग्रामपंचायतीने तलावामधून पाणी उपसा कमी केला आहे. इतरवेळी तलावामधून महापालिका 6 तर कळंबा ग्रामपंचायत 2 एमएलडी पाणी उपसा केला जातो. मात्र सद्यस्थितीत पालिकेकडून 2 तर पंचायतीकडून केवळ दीड एमएलडी पाणी उपसा तलावामधून सुरु आहे.
ग्रामपंचायतीकडून लवकरच पर्यायी व्यवस्था
पाणीपुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बोअरवेलमधून गावविहिरीत पाणी सोडले आहे. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरु असून पाणीपुरवठ्यासाठी लवकरच पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्नशील आहे.
– सुमन गुरव,सरपंच
सध्या पाण्याची पातळी खालावल्याने पाणी टंचाई जाणवत आहे सध्या दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे दोन दिवसात महापालिकेशी चर्चा करून पाण्याचे नोयोजन करणार आहे.
पूनम जाधव, ग्रामपंचायत सदस्या
ग्रामपंचायतीकडून आवाहन
सध्या तलावाची पाणी पातळी घाटल्याने ऐरवी वीस मिनिटे होणारा पाणीपुरवठा आता केवळ दिवसाआड फक्त दहा मिनिटे केला जात आहे तलावाची पाणी पातळी सध्या खालावल्याने पाणी गरम करून उकळून प्यावे तसेच ज्या ग्रामस्थांच्या घरीबोर आहे त्यांनी शेजाऱ्यांना पाणी देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे