‘गद्दार’ कोण हे येत्या निवडणुकीतच समजेल ः एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित केल्यानंतर काही वेळातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून पलटवार केला. ‘आम्ही कोणाचेही मिंधे नसून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे’ असल्याचा टोला त्यांनी लगावला. ‘होय, मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे’ असे सांगत राज्याच्या विकासाचे कंत्राट हाती घेतल्याचा दावाही त्यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजधानीतून बुधवारी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट प्रहार केला. त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी केलेले विविध आरोप खोडून काढले. बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांशी कधीही तडजोड केली नाही. तीच निती आम्ही आचरणात आणणार असून राज्याच्या विकासासाठी पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट केले. अडीच वर्षानंतर गटप्रमुखांची आठवण आली का? असा प्रश्न विचारतानाच आतापर्यंत त्यांना किती निधी दिला याचे उत्तर शोधण्याचा सल्ला शिंदे यांनी उद्धवना दिला.
एकनाथ शिंदे यांनी आपण राज्यप्रमुखांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेल्याचे स्पष्ट केले. या दिल्ली दौऱयादरम्यान महाराष्ट्र सदनात झालेल्या सत्कार सोहळय़ानंतर त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच उद्धव ठाकरेंच्या गटप्रमुख मेळाव्यावर सडेतोड टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीच्या स्थापनेचा निर्णय कसा चुकीचा होता हेसुद्धा त्यांनी सांगितले. तसेच आता सत्तेत आलेल्या शिंदे गट-भाजप्रणित सरकारचे त्यांनी जोरदार समर्थन केले. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचेही ते म्हणाले. तसेच राज्यात आत्ताच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिंदे गटाने ठाकरे गटापेक्षा सरस कामगिरी केल्याचा उल्लेखही त्यांनी केला.